2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, हा सामना 15 फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबो येथे होणार होता. मात्र, पाकिस्तान सरकारने वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, त्यांचा संघ स्पर्धेत तर खेळेल पण भारतासोबत सामना खेळणार नाही. आता मात्र पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यासाठी एक अट ठेवली आहे.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (PCB) अशी इच्छा आहे की टीम इंडियाने एका तिरंगी मालिकेत (Tri-series) सहभागी व्हावे. या मालिकेत भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे तीन संघ असतील. जर भारताने हा प्रस्ताव मान्य केला, तरच पाकिस्तानचे पंतप्रधान त्यांच्या संघाला वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी देतील. ही तिरंगी मालिका एखाद्या तटस्थ ठिकाणी (Neutral Venue) खेळवली जाईल. मात्र, अद्याप आयसीसी किंवा कोणत्याही बोर्डाने अधिकृत घोषणा केलेली नाही.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या एका सामन्याला एवढं महत्त्व का दिलं जातंय? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पैसा (कमाई). वर्ल्ड कपमधील हा सर्वात जास्त कमाई करून देणारा सामना असतो. चाहते हा सामना अत्यंत आवडीने पाहतात, म्हणून सहसा हा सामना शनिवार किंवा रविवारी ठेवला जातो जेणेकरून व्ह्यूअरशिप वाढावी. जितके जास्त लोक सामना पाहतील, तितका जास्त महसूल (Revenue) वाढतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी स्पर्धेतील भारत-पाक एका सामन्यातून सुमारे 250 मिलियन डॉलर्स (2200 कोटी रुपयांहून अधिक) महसूल मिळतो. जर हा सामना झाला नाही, तर आयसीसीपासून ब्रॉडकास्टर्सपर्यंत सर्वांचेच मोठे आर्थिक नुकसान होईल. विशेष म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एकूण कमाईचा सुमारे 80% हिस्सा आयसीसीकडून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून असतो. जर सामना झाला नाही, तर आयसीसी पाकिस्तानचा हिस्सा रोखू शकते, ज्यामुळे पाकिस्तान बोर्डावर ‘कंगाल’ होण्याची वेळ येऊ शकते.






