जगभरात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी दोन देशांसाठी क्रिकेट खेळलं आहे. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, यापैकी काही क्रिकेटपटू असे देखील आहेत, ज्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे!
पाकिस्तानला 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. फाळणीनंतर 3 भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानात जाऊन स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी तिथे नवीन संघ तयार केला आणि भारताविरुद्ध खेळायला सुरुवात केली. चला तर मग जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल.
(1) अब्दुल हफीज कारदार – अब्दुल हफीज कारदार यांना पाकिस्तान क्रिकेटचं जनक म्हटलं जातं. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील 26 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 927 धावा केल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 21 विकेट्सही घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे अब्दुल हफीझ यांनी 3 कसोटी सामने भारतीय संघासाठी आणि 23 कसोटी सामने पाकिस्तानसाठी खेळले आहेत.
अब्दुल हफीज कारदार 1952 मध्ये पाकिस्तानचे कर्णधार बनले. ते पाकिस्तानचे पहिले कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं लखनऊ येथे झालेल्या कसोटीत भारताचा पराभव केला होता. ते 1972 ते 1975 पर्यंत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुखही होते. हाफिज यांनी नंतर पाकिस्तानच्या राजकारणातही हात आजमावला आणि स्वित्झर्लंडमध्ये पाकिस्तानचा राजदूत म्हणून काम केलं.
(2) आमिर इलाही – या यादीतील दुसरे क्रिकेटपटू आमिर इलाही आहेत, ज्यांच्याबद्दल फार कमी चाहत्यांना माहिती असेल. आमिर इलाही त्यांच्या कारकिर्दीत फक्त 6 कसोटी सामने खेळले. ते भारताकडून 1 आणि पाकिस्तानकडून 5 कसोटी सामने खेळले. त्यांनी 6 कसोटी सामन्यात 82 धावा आणि 7 विकेट घेतल्या. त्यांनी भारतासाठी पहिला सामना 1947 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळला होता. यानंतर फाळणी होऊन ते पाकिस्तानात गेले.
(3) गुल मोहम्मद – क्रिकेट फार वर्षांपासून पाहणाऱ्यांना गुल मोहम्मद हे नाव नक्कीच माहीत असेल. आपल्या कारकिर्दीत 9 कसोटी खेळणाऱ्या गुल मोहम्मद यांनी भारताकडून 8 सामने खेळले. 1955 मध्ये पाकिस्तानचे नागरिकत्व घेतल्यानंतर त्यांना पाकिस्तानकडून सामना खेळण्याची संधी मिळाली. गुल मोहम्मद यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1921 ला लाहोरमध्ये झाला होता. ते डावखुरे फलंदाज आणि डावखुरे गोलंदाज होतो. यासोबतच ते त्यांच्या क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जात होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑलिम्पिकमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा किती पुढे? दोन्ही देशांनी आतापर्यंत किती पदकं जिंकली? जाणून घ्या
“तर विराट भारतालाही विसरेल…”, शाहिद आफ्रिदीने कोहलीबद्दल केले मोठे वक्तव्य
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज