भारताविरुद्धच्या टी20 मालिकेत श्रीलंकेची कामगिरी खूपच खराब झाली होती. त्यानंतर एकदिवसीय मालिकेतही अशीच परिस्थिती असेल, अशी सर्वांची अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही. श्रीलंकेनं घरच्या परिस्थितीचा फायदा उठवत पहिल्या दोन वनडेत टीम इंडियाला चकित केलं. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत राहिला तर दुसरा सामना श्रीलंकेनं 32 धावांनी जिंकला. या विजयासह श्रीलंकेनं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 50 षटकात 9 बाद 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं बिनबाद 97 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर विकेट पडण्याचा सिलसिला सुरू झाला. भारताचा संपूर्ण संघ 43व्या षटकात 208 धावा करून ऑलआऊट झाला. या बातमीद्वारे आम्ही या सामन्यातील टीम इंडियाच्या पराभवाची 3 प्रमुख कारणं सांगणार आहोत.
(1) मधल्या फळीतील प्रमुख खेळाडूंची कमकुवत फलंदाजी – धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात मिळाली होती. पण यानंतर रोहित शर्माची विकेट पडली. रोहितच्या विकेटनंतर भारताची अवस्था बिघडायला लागली. मधल्या फळीतील फलंदाज काही कमाल दाखवू शकले नाहीत. विराट कोहलीला केवळ 14 धावांचं योगदान देता आलं. तर श्रेयस अय्यरनं अवघ्या 7 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलला खातंही उघडता आलं नाही. मधल्या फळीला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही, ज्याचे परिणाम संघाला भोगावे लागले.
(2) श्रीलंकेचं शेपूट वळवळलं – भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केलं होतं. एका क्षणी श्रीलंकेची धावसंख्या 6 विकेट गमावून 136 धावा होती. येथून 200 धावांचा आकडा गाठणंही श्रीलंकेसाठी अशक्य वाटत होतं. मात्र ड्युनिथ वेलालागे (39) आणि कामिंडू मेंडिस (40) यांनी सातव्या विकेटसाठी 72 धावा जोडल्या. त्यांच्या खेळीमुळेच श्रीलंकेला 240 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं.
(3) फलंदाजीच्या क्रमात बरेच बदल – दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजीच्या क्रमात बराच बदल करण्यात आला. पहिल्या तीन फलंदाजांमध्ये, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली नियमित क्रमानं आले. पण त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्याऐवजी शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांना 4 आणि 5व्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. ही चाल चालली नाही आणि अय्यर आणि राहुल दोघंही विशेष काही कमाल करू शकले नाहीत. तर दुबेला खातंही उघडता आलं नाही.
हेही वाचा –
IND vs SL निर्णायक सामन्यात भारताचा पराभव, श्रीलंकेचा 32 धावांनी शानदार विजय
SL vs IND : श्रीलंकेचा लखलखता तारा, जोरदार ‘सिक्स’ मारत जेफ्री वँडरसेने टीम इंडियाला आणले बॅकफूटवर
बाऊंड्रीलाईनवरून श्रेयस अय्यरचा गुलीगत थ्रो, बॅट्समनच्या दांड्या गुल; व्हिडिओ व्हायरल