भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून गणना केली जाते. त्याने नुकतीच १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तो भारताचा केवळ यशस्वी कर्णधारच नाही, एक यशस्वी यष्टीरक्षक फलंदाजही होता. त्याने भारताकडून खेळताना अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५३८ सामने खेळण्याबरोबरच ३०० पेक्षा अधिक सामन्यात नेतृत्वही केले. याबरोबरच धोनीला जगभरात करोडोंनी चाहतेही मिळाले. पण असे असतानाही नेहमी शांत स्वभावासाठी ओळखला जाणाऱ्या धोनीच्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत काही वादही झाले, ज्यात तो अडकला. अशाच ५ वादांबद्दल या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
५. बलिदान चिन्हामुळे सापडला वादात –
२०१९ च्या विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात एमएस धोनीच्या यष्टीरक्षणाच्या ग्लोव्हजवर ‘बलिदान चिन्ह’ होते. त्यामुळे या सामन्यात धोनीच्या अशा गोष्टीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
धोनीने बलिदान चिन्ह लावणे नियामाविरुद्ध असल्याचे म्हणत त्याची तक्रार पाकिस्तानने आईसीसीकडे केली होती. नंतर आयसीसीने धोनीला ते चिन्ह काढायला सांगतले. त्यामुळे हे प्रकरण बर्याच वादात होते.
आयसीसीने सांगितले होते की ‘आयसीसीच्या स्पर्धांच्या नियमांनुसार कोणत्याही साधनांवर आणि कपड्यांवर कोणताही वैयक्तिक संदेश किंवा लोगोचे प्रदर्शन करण्याची परवानगी नाही. तसेच हा लोगो(बलिदान चिन्ह) घालणे हे यष्टीरक्षकाच्या ग्वव्हजवरील काय असावे या नियमांचेही उल्लंघन करणारे आहे.’
आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक यष्टीरक्षकाच्या ग्लव्हजवर फक्त ग्लव्हज तयार करणाऱ्या कंपनीचे दोन लोगो लावण्याची परवानगी आहे.
४. रिअल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुपमुळे वाद
सर्वोच्च न्यायालयाने रिअल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुपची नोंदणी रद्द केली होती. आम्रपाली ग्रुपवर गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण न करता ४२ हजाराहून अधिक गृह खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या आरोपांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांचे नावदेखील बरेच चर्चेत होते.
एका परीक्षण अहवालानुसार धोनीची पत्नी साक्षी धोनी आम्रपाली माही डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएमडीपीएल) ची संचालक आणि कंपनीची २५ टक्के शेअरहोल्डर होती, ज्यामुळे तिच्यावरही फसवणूकीचा आरोप झाला होता.
३. निवडकर्त्यांशी वादविवाद
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू, माजी कर्णधार तसचे निवडकर्ता मोहिंदर अमरनाथ यांचेही नाव या यादीत आहे. खरं तर, २०११ मध्ये भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध कसोटीत ४-० असा पराभव झाला होता, तर २०११-१२ मध्येही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ४-० असाच पराभव पत्करावा लागला होता.
अशा परिस्थितीत मोहिंदर अमरनाथ यांनी एमएस धोनीला कर्णधारपदावरून काढून टाकून सेहवागला कर्णधार बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन होते आणि त्यांनी मोहिंदर अमरनाथ यांनाच निवड समितीच्या पदावरून काढून टाकले होते. तसे पाहता एन श्रीनिवासन चेन्नई सुपर किंग्ज संघाचे देखील मालक देखील होते आणि त्यांचा धोनीवर खूप विश्वास होता.
पण या प्रकरणामुळे वाद झाला होता. तसेच जेव्हा जेव्हा धोनी भारतीय संघासाठी खराब कामगिरी करायचा, तेव्हा मोहिंदर अमरनाथ हे माध्यमांद्वारे धोनीवर टीका करायचे.
२. भगवान विष्णूच्या अवतारात मासिक छापण्यामुळे वाद झाला
२०१३ मध्ये बिझिनेस टुडे या मासिकामध्ये मुखपृष्ठावर धोनीचे छायाचित्र प्रकाशित झाले होते. या छायाचित्रात धोनी भगवान विष्णूच्या या अवतारात दिसत होता. धोनीच्या या चित्रावर बरीच टीका झाली होती.
या चित्रामुळे धोनी वादात सापडला होता. त्यावेळी हिंदू धर्मातील काही लोकांनी त्याचा तीव्र विरोध केला. पण नंतर हे प्रकरण सोडविले गेले.
१. बकरीचा दिला बळी
२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याचवर्षी एमएस धोनीला वनडेचे कर्णधारपद देण्यात आले होते. २००८ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये तिरंगी मालिका खेळली, ज्यात श्रीलंकेचाही समावेश होता. त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सिडनी आणि ब्रिस्बेनमधील सामने जिंकून मालिका जिंकली. पण विजयानंतर धोनीने स्वतःला वादाच्या भोवऱ्यात अडकवले.
भारतीय कर्णधार म्हणून धोनीचा हा परदेशातील वनडे मालिकेतील पहिला विजय होता. यानंतर धोनीने विजय साजरा करण्यासाठी रांची येथील मंदिरात बकरीचा बळी दिला. धोनीच्या अशा कृतीमुळे संपूर्ण देश संतापला. त्यामुळे धोनीला याची ग्वाही द्यावी लागली की तो पुन्हा कधीही अशी कृती करणार नाही.