टी-२० विश्वचषकात रविवारी (७ नोव्हेंबर) खेळला जाणारा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय संघासाठी महत्वाचा झाला आहे. भारत सध्या विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि संघाला स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पोहोचायचे असेल, तर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करणे गरजेचे असणार आहे. या सामन्याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशात भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी या सामन्याविषयी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते अफगाणिस्तान संघ न्यूझीलंडला पराभूत करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.
अफगाणिस्तानने जर या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला, तर भारतीय संघाचा स्पर्धेतील पुढचा प्रवास सोपा होणार आहे. न्यूझीलंड ग्रूप दोनच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असून उपांत्य सामन्यात जागा बनवण्यासाठी प्रमुख दावेदार आहे, तर पाकिस्तानने यापूर्वीच उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले आहे. अशात अफगाणिस्तान या महत्वाच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करू शकतो, असे मत अजित आगरकरांनी मांडले आहे.
आगरकर ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “अफगाणिस्तानकडे न्यूझीलंडला पराभूत करण्याची संधी आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि चांगले गोलंदाजही आहेत. जर हा सामना दुपारचा आहे, तर फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्याव्यतिरिक्त न्यूझीलंडची फलंदाजीही एवढी चांगली वाटत नाहीये. त्यांनी त्यांचे मागचे दोन्ही सामने खूप अडचणीतून जिंकले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी केली, तर ते न्यूझीलंडला अडचणीत टाकू शकतात.”
अफगाणिस्तान संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान सध्या दुखापतग्रस्त असून त्याच्या फिटनेसविषयी सर्वांना चिंता वाटत आहे. सर्वांचे लक्ष सध्या त्याच्या फिटनेसवर आहे. अशात जर तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी फिट झाला आणि या सामन्यात खेळला, तर अफगाणिस्तानच्या विजयाची अपेक्षा वाढणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाने त्यांचा विश्वचषकातीत शेवटच्या सामन्यात स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला. त्यामुळे भारताच्या नेट रन रेटमध्ये चांगलाच सुधार झाला आहे आणि उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशाही वाढल्या आहेत. अशात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील होणारा सामना भारतीय संघाचा विश्वचषकातील पुढचा प्रवास ठरवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी






