आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) बुधवारी (११ मार्च) पुरुष टी२० क्रमवारी जाहीर केली. या ताज्या क्रमवारीमध्ये अनेक धक्कादायक बदल पाहायला मिळाले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता सहाव्या क्रमांकावर आला आहे. त्याने २०२६च्या विश्वचषकात ८ सामन्यांमध्ये खेळताना सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या. तसेच तो न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’ही ठरला होता. त्यामध्ये त्याने ४ षटकात १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. तो सामना भारताने ९६ धावांनी जिंकला आणि यजमान तिसऱ्यांदा टी२० विश्वविजेता बनला.
याच स्पर्धेत ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना हैरान केले तो म्हणजे संजू सॅमसन. त्याने फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये १८ स्थानांची झेप घेतली आहे. तो आता २२व्या क्रमांकावर आहे. तो या स्पर्धेचा ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ ठरला होता. त्याने पाच सामन्यात १९९.३७च्या स्ट्राईक रेटने ३ अर्धशतकांसह ३२१ धावा केल्या. या भारताकडून सर्वाधिक धावा ठरल्या. तसेच त्याने अंतिम सामन्यात ८९ धावांची धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या या मोठ्या खेळीमुळे भारताने न्यूझीलंडला २५६ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते.
दुसरीकडे ईशान किशनलाही या क्रमवारीमध्ये दोन स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने दुसरा क्रमांक गाठला आहे. त्याने या स्पर्धेत ३१७ धावा केल्या होत्या. आयसीसी टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी अभिषेक शर्मा कायम आहे. त्याने अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. तसेच या क्रमवारीमध्ये तिलक वर्मा सातव्या आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचे विश्वचषकानंतर क्रमांक एकचे स्थान हालले आहे. त्याला मागे टाकत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान नवा क्रमांक-१ चा गोलंदाज बनला आहे. राशिदचे ७५३ रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसरीकडे वरुणचे ७४० रेटिंग पॉइंट्स झाले आहेत. वरुणने टी२० विश्वचषकात सर्व ९ सामने खेळले होते. यामध्ये त्याने १४ विकेट्स घेतल्या होत्या.






