मुंबई। शनिवारी (४ डिसेंबर) न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने मोठा इतिहास रचला आहे. त्याने भारताविरुद्ध वानखेडेवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व १० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. यासह त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
तिसरा गोलंदाज
एजाज पटेलने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात ११९ धावा देत १० विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने भारताच्या १० क्रिकेटपटूंपैकी ती जणांना तर शुन्यावर माघारी धाडले.
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्व १० विकेट्स घेणारा एजाज हा १५० वर्षांच्या इतिहासातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम अनिल कुंबळे आणि जिम लेकर यांनी केला होता.
इंग्लडचे गोलंदाज लेकर यांनी अशी कामगिरी सर्वप्रथम केली होती. त्यांनी १९५६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याच्या दुसऱ्या डावात ५३ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अनिल कुंबळेने दिल्लीमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्याच्या चौथ्या डावात ७४ धावांत १० विकेट्स घेतल्या होत्या.
याशिवाय एजाज हा सामन्याच्या पहिल्या डावात १० विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
मुंबईशी खास नाते
एजाजबद्दल खास गोष्ट म्हणजे तो भारतीय वंशाचा गोलंदाज आहे. त्याचा जन्म मुंबई शहरात झाला होता. पण, वयाच्या ८ व्या वर्षी तो त्याच्या पालकांसह न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. योगायोग म्हणजे एजाजने एका कसोटी डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याच्याच जन्मस्थळ असलेल्या मुंबई शहरात केला आहे.
भारताकडून मयंकचं शतक
मुंबई कसोटीत भारताकडून पहिल्या डावात मयंक अगरवालने शतकी खेळी केली. त्याने ३११ चेंडूत १५० धावांची खेळी केली. तसेच अक्षर पटेलने ५२ धावांची खेळी केली, तर शुबमन गिलने ४४ धावांचे योगदान दिले. भारताचे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि आर अश्विन हे तीन खेळाडू शुन्य धावेवर बाद झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग.! ओमिक्रॉनच्या संकटातही भारताचा आफ्रिका दौरा होणार, सामन्यांची संख्याही ठरली – बीसीसीआय