---Advertisement---

कॅप्टनकूल नंतर फक्त रहाणे..! बॉक्सिंग डे कसोटी जिंकत अजिंक्यची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 12:07 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ८ विकेट्सने जिंकला. याबरोबर कसोटी मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली असून आता मालिकेतील २ सामने नविन वर्षात खेळवले जाणार आहेत. दुसऱ्या सामन्यात संघाचे शानदार नेतृत्त्व करतानाच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रहाणेने शानदार फलंदाजीही केली. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत पहिल्यांदाच दिले गेलेले ‘जॉनी मुलाघ मेडल’ही रहाणेला मिळाले. या विजयाबरोबर कर्णधार म्हणून रहाणेने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.

रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकलेत तीन कसोटी सामने

सर्वप्रथम २०१७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते. २५ मार्च ते २८ मार्च या कालावधीत धरमशाला स्टेडिमयवर झालेल्या या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजयी पताका झळकावली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३०० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३२ धावांची आघाडी मिळवली होती.

पुढे दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलिया संघ १३७ धावांवर गारद झाला. त्यानंतर भारताने अवघ्या २४ षटकात ऑस्ट्रेलियाचे १०६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. अशाप्रकारे रहाणेने आपल्या नेतृत्त्वाखालील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.

एवढेच नव्हे तर, २०१८ मध्ये अफगानिस्तान विरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही रहाणेने भारताचे नेतृत्व करताना संघाच्या पारड्यात विजयाची भर घातली होती. १४ जून ते १५ जून २०१८ दरम्यान बेंगळुरू येथे झालेला हा सामना भारताने एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता. हा रहाणेच्या नेतृत्त्वाखालील दुसरा कसोटी सामना होता. त्यानंतर नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत विजय मिळवत रहाणेने कर्णधाराच्या रुपात भारताला तिसरा कसोटी सामना जिंकून दिला आहे.

यासह रहाणे कर्णधार म्हणून पहिले तीन कसोटी सामने जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्यापुर्वी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने हा पराक्रम केला होता. धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखालील पहिल्या चार कसोटी सामन्यात भारतीय संघाला यश मिळवून दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

पैज लावली तरी चालेल.! रहाणेचं शतक आणि टीम इंडियाचा पराभव, शक्यच नाय…

बुम बुम बुमराह! परदेशातील खेळपट्टींवर बुमराहने केलेल्या अफलातून कामगिरीची आकडेवारी

क्या बात अज्जू! ‘जॉनी मुलाघ मेडल’ जिंकणारा अजिंक्य रहाणे ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---