भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर- गावसकर मालिकेमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी पुढील वाटचाल अवघड मानली जात होती. नियमित कर्णधार विराट कोहलीची पालकत्व रजा व जवळजवळ दहा प्रमुख खेळाडूंची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत होती.
मात्र या सर्व कठीण परिस्थितीतही कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्व क्षमतेची चुणूक दाखवत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयाबद्दल संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून आनंद व्यक्त केला जात आहे. अशातच अजिंक्यची प्रतिक्रिया समोर येत असून त्याने एक असा प्रसंग उलगडला आहे जो तो केव्हाही विसरणार नाही.
अजिंक्यने मेलबर्न येथे झालेली बैठक (मिटींग) कधीही विसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजिंक्य म्हणाला, “ऍडलेड कसोटी सामन्यानंतर मेलबर्न येथे झालेली संघाची बैठक मला नेहमीच स्मरणात राहील. मी कर्णधारपदाचा कार्यभार तेथेच स्विकारला होता. त्या बैठकी पासूनच सर्व काही सुरू झाले. मालिकेत पुढे काय होईल? हे आम्हाला माहित नव्हते. परंतु आम्ही एकजूट होतो. आम्ही सर्वांनी उत्तम कामगिरी करण्याचे ठरवले होते. जेव्हा आम्ही एकत्र जमलो होतो, तेव्हाचा तो क्षण खूप खास होता.”
अजिंक्य रहाणेची कसोटी मालिकेतील कामगिरी
अजिंक्यने भारतीय संघावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत मालिकेत आपल्या नेतृत्वासोबतच फलंदाजीत देखील उत्तम कामगिरी केली. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्यने शानदार शतक झळकावले होते. अजिंक्यने भारताच्या पहिल्या डावात 223 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या होत्या. अजिंक्यच्या या खेळीमुळेच भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामना जिंकला व मालिकेत जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर अखेरचा कसोटी सामना जिंकत मालिका 2-1 ने खिशात घातली.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: १४० किलो वजन असलेला क्रिकेटर, ज्याचे विराट कोहलीने बदलले आयुष्य
“येत्या १० वर्षात शुबमन गिलचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी सलामीवीरांमध्ये असेल”
केकेआरचा शिलेदार नरेनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती