आयर्लंड आणि भारत यांच्यातील टी-20 मालिका शुक्रवारी (19 जुलै) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना भारताने 2 धावांनी जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे पंचांनी भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी घोषित केले. मालिकेची सुरुवात भारतासाठी चांगली झाली. मात्र, युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नावे या सामन्यात नकोशा विक्रमाची नोंद झाली.
या सामन्यात भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाज खेळवले होते. यामध्ये कर्णधार जसप्रीत बुमराह, अर्शदीप व पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा हे सामील होते. बुमराह व कृष्णा यांनी प्रत्येकी दोन तर, अर्शदीपने एक बळी मिळवला. त्याने आपल्या चार षटकात 34 धावा दिल्या. यासोबतच त्याच्या नावे दोन लाजिरवाणे विक्रम जमा झाले.
अर्शदीपने आपल्या छोट्याशा कारकीर्दीत दोन वेळा अखेरच्या षटकात 20 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या. या सामन्यातील अखेरच्या षटकात त्याने 22 धावा दिल्या होत्या. यापूर्वी भारताकडून 8 असे गोलंदाज राहिले आहेत ज्यांनी प्रत्येकी एकदा 20 धावा करण्याची संधी विरोधी फलंदाजांना दिलेली.
याचबरोबर अर्शदीप हा टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 16 नो बॉल टाकणारा एकमेव गोलंदाज आहे. या सामन्यात त्याने एक नो बॉल टाकला होता. जसप्रीत बुमराह 8 नो बॉलसह दुसऱ्या स्थानी आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर आयर्लंडला प्रथम फलंदाजी करावी लागली. निर्धारित 20 षटकांमध्ये आयर्लंडने 7 बाद 139 धावा केल्या. अष्टपैलू बॅरी मॅकार्थी याने नाबाद अर्धशतक झळकावले. 140 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर भारताने 6.5 षटकात 2 बाद 47 धावा केल्या होत्या. मात्र, तितक्यात मैदानात पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि भारताला विजयी घोषित करण्यात आले. दोन बळी मिळवणारा भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.
(Arshdeep Singh Bowled Most No Balls For India In T20I Against Ireland)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकाची संधी हुकल्यानंतर ब्रूकची रिऍक्शन! म्हणाला, ‘स्टोक्स संघात आल्यामुळे मला…’
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव