मुंबई । वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केलेली आहे. मात्र, दुसरीकडे भारतात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून खेळाडू आपल्या घरातच आहेत. बीसीसीआयने खेळाडूंना भारतीय खेळाडूंना व्यक्तिगत सरावास सुरू करण्यास सांगितले आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल म्हणाले की, राष्ट्रीय संघातील खेळाडूंना एकत्रितपणे सराव करण्यासाठी नियोजन करत आहे. प्रत्येक राज्यात लॉकडाउन संदर्भात वेगवेगळे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्यांनी सांगितलेल्या नियमानुसार आम्ही काम करणार आहोत. खेळाडूंना सराव करता यावा यासाठी बीसीसीआय सुरक्षित ठिकाण शोधत आहे. सर्व भारतीय खेळाडू एकत्रितपणे केव्हा येतील हे अद्याप सांगता येणार नाही.
बीसीसीआय भारतीय संघाच्या सरावासाठी सुरक्षित ठिकाण निवडत आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे या ठिकाणी सराव होऊ शकणार नाही. धर्मशाळाच्या मैदानावर भारतीय संघ सराव करू शकतो कारण येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. ते खेळाडूंसाठी सुरक्षित ठिकाण असेल. ऑक्टोंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाला पुरेसा वेळ आवश्यक आहे.