---Advertisement---

महिला आशिया चषकाच्या इतिहासात भारत सलग 8व्यांदा अंतिम फेरीत, थायलंडचा दारूण पराभव

On: गुरूवार, ऑक्टोबर 13, 2022 11:34 AM
Team India
---Advertisement---

महिला आशिया चषक 2022च्या पहिल्या उपांत्य फेरीत गुरूवारी (13 ऑक्टोबर) भारत-थायलंड पुन्हा एकदा समोरा-समोर आले. यावेळी भारताने नाणेफेक गमावली असली तरी सामना सहज जिंकत अंतिम फेरीत धमाकेदार प्रवेश केला आहे. भारताने हा सामना 74 धावांनी जिंकला आहे. थायलंडचा संघ 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकात 9 विकेट्स गमावत 74 धावसंख्याच करू शकला. या विजयाचे नायक ठरले शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर आणि दीप्ति शर्मा.

महिला आशिया चषकाच्या इतिहासात भारताने सलग 8व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत सहा वेळा आशिया चषकाचा चॅम्पियन ठरला आहे. केवळ मागील हंगामात भारत पराभूत झाला होता.

बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताकडून शफाली वर्मा आणि दीप्ति शर्मा यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शफालीने फलंदाजी करताना 42 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 2 षटके टाकताना एक विकेटही घेतली. यावेळी दीप्तिने थायलंडच्या पहिल्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. तिने 4 षटके टाकताना 7 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी तिने एक षटक निर्धावही टाकले आहेत. तिच्याव्यतिरिक्त राजेश्वरी गायकवाड हीने 4 षटकात 10 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना शफाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या उत्तम खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 विकेट्स गमावत 148 धावा केल्या. यावेळी हरमनप्रीतने 36 धावा केल्या. तसेच जेमीमा रोड्रिग्जने 27 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंड संघाची अडखळत सुरूवात झाली. दीप्तिने एकामागोमाग तीन झटके देत विरोधी संघाची स्थिती वाईट केली. तिने नन्नपत कोंचरोएंकाय (Nannapat Koncharoenkai), नत्थकन चन्थम (Natthakan Chantham) आणि सोर्नारिन टिपोच यांच्या विकेट्स घेतल्या. थायलंडने हा सामना गमावला असला तरी त्यांनी यंदा प्रथमच आशिया चषकाच्या अंतिम चार संघामध्ये प्रवेश करत इतिहास रचला होता. तसेच त्यांनी साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभूत करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

या स्पर्धेत दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तान जिंकला तर चाहत्यांना 15 ऑक्टोबरला होणाऱ्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 World Cup: बंगळुरू ते ऑस्ट्रेलिया, मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
अब आयेगा मजा! थिएटरमध्ये पाहता येणार टी20 विश्वचषकातील भारताचे सर्व सामने, 25 शहरात मिळणार सुविधा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---