बेंगळुरू एफसी आणि यश या दोन गोष्टी हातात हात घालून फिरत असतात. 2013 मध्ये स्थापना झाल्यापासून दर मोसमात बीएफसीने किमान एक तरी करंडक जिंकला आहे. भाग घेतलेल्या प्रत्येक स्थानिक स्पर्धेत त्यांनी एकदा तरी जेतेपद मिळविले आहे.
दोन मोसमांपूर्वी हिरो इंडियन सुपर लीगमध्ये प्रवेश केल्यापासून बीएफसीने उच्च दर्जा निर्माण केला आहे. साखळी गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविलेला, अंतिम फेरी गाठलेला आणि विजेतेपद मिळविलेला हा एकमेव क्लब आहे. गत मोसमात एफसी गोवा संघाविरुद्ध बीएफसीने हे यश साकार केले.
आयएसएलच्या इतिहासात जेतेपद राखण्याची कामगिरी अद्याप एकाही संघाला करता आलेली नाही. एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांना दोन वेळा अपयश आले आहे. कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बीएफसी संघातील खेळाडूंना मात्र आजवर अशक्य ठरलेली गोष्ट शक्य करता येणार नाही अशी पैज कुणीही लावणार नाही.
बीएफसीचा कर्णधार सुनील छेत्री याने सांगितले की, सहभागी झालेली प्रत्येक स्पर्धा आम्हाला जिंकायची असते. आता आयएसएल जेतेपद राखण्याचे आव्हान आहे. या मोसमात ते आणखी खडतर असणार याची आम्हाला कल्पना आहे. महत्त्वाचे म्हणजे आम्ही आशियाई स्पर्धेत पुनरागमन केले आहे. आम्ही चुरशीने खेळू शकतो आणि चांगली कामगिरी करतो हे आम्ही एका पेक्षा जास्त मोसमांमध्ये दाखून दिले आहे. यावेळीही क्षमतेचे उत्तम प्रदर्शन करीत राहणे आणि स्वतःसमोर जेतेपद राखण्याचे आव्हान निर्माण करणे असे आमचे उद्देश आहेत.
यंदा बीएफसीचा संघ भक्कम आहे. त्यांनी संघात आणखी चांगले खेळाडू भरती केले आहेत. यात भारताचा तरुण आंतरराष्ट्रीय खेळाडू आशिक कुरुनीयन, चेन्नईयीएन एफसीचा माजी मध्यरक्षक रॅफेल आगुस्टो आणि स्पेनचा स्ट्रायकर मॅन्यूएल ओन्वू यांचा समावेश आहे. त्यांचा सर्वात मोठा स्टार अर्थातच छेत्री आहे. क्लब आणि देशासाठी त्याने प्रदर्शित केलेला फॉर्म पाहता त्याची यशोगाथा कायम राहण्याचीच अपेक्षा आहे.
छेत्रीने गोल, दृष्टिकोन आणि नेतृत्व क्षमता अशा गुणांच्या जोरावर क्लब आणि देशासाठी कलाटणी देणारी कामगिरी केली आहे. तो म्हणाला की, 2013 मध्ये मी बीएफसीकडे करारबद्ध झालो. क्लबला करंडक जिंकून देण्यासाठी स्वतः आदर्श निर्माण करणे आणि माझ्याठायी असलेली प्रत्येक गोष्ट सादर करणे अशा जबाबदाऱ्या होत्या.
बीएफसीला जेतेपदाने कशी थोडक्यात हुलकावणी दिली हे सर्वांना ठाऊक आहे. बीएफसीला तर हा अनुभव अगदी जवळून आला आहे. 2017-18च्या मोसमात श्री कांतीरवा स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीविरुद्ध ते हरले होते. बालेकिल्यात त्यांना हार पत्करावी लागली होती.
एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांना पूर्वी न जमलेली कामगिरी करून दाखवायची असेल तर छेत्री आणि कंपनीला यंदाच्या मोसमात सतत सज्ज राहावे लागेल.