तब्बल सतरा वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत असलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या कसोटीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सामन्याच्या चार दिवसानंतर इंग्लंड संघ सामन्यात पुढे असून, अखेरच्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी मोठे लक्ष पार करावे लागेल. त्याचवेळी अखेरचा दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पाकिस्तान संघाला खुले आव्हान दिले आहे.
रावळपिंडी येथील फलंदाजांना पूरक असलेल्या खेळपट्टीवर सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने पाकिस्तानचा पहिला डाव 579 धावांत गुंडाळला. त्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावातही आक्रमक फलंदाजी केली. क्राऊली आणि हॅरी ब्रूक यांनी पहिल्या डावाप्रमाणे तुफानी फटकेबाजी करत धावा वसूल केल्या. त्याचवेळी पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या जो रूटनेही आक्रमक अर्धशतक झळकावले. हॅरी ब्रुक 87 धावा करून माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने एक धाडसी निर्णय घेतला. त्याने आपल्या संघाचा डाव घोषित करत पाकिस्तानसमोर 343 धावांचे आव्हान ठेवले.
अनेकांना या निर्णयाचे आश्चर्य वाटले. कारण, चौथ्या दिवशीची जवळपास 30 षटके तसेच संपूर्ण पाचवा दिवस मिळून पाकिस्तानला या धावा करण्यासाठी 120 षटके मिळतील. या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने दोन गडी गमावत 80 धावा केल्या होत्या.
फलंदाजांचे नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर इंग्लंडने हा निर्णय घेतल्याने काहींनी त्यांचे कौतुकही केले. या निर्णयाची पाठराखण करताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला,
“कसोटी सामना जिंकण्यासाठी केवळ आक्रमक फलंदाजीच आम्ही करणार नाही. आमचे निर्णयही तसेच आक्रमक असतील. विजय मिळवण्यासाठी आम्ही हरण्याची जोखीम देखील पत्करायला तयार आहोत. आता हा सामना पाकिस्तानला जिंकून दाखवावा लागेल.”
रावळपिंडी येथील या खेळपट्टीवर चार दिवसात मोठ्या धावा फटकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी या खेळपट्टीवर टीका केलेली दिसून येते.
(Ben Stokes Said We Will Take Risk For Win Against Pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिज चारीमुंड्या चीत! यजमानांचा पर्थ कसोटीवर 164 धावांनी कब्जा
सलामीपेक्षा मध्यक्रमात राहुल गोलंदाजांसाठी जास्त घातक! ‘अशी’ आहे आकडेवारी