भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला सुरू गवसला नव्हता. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत चांगले पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना नामिबियाविरुद्ध होणार आहे. नामिबियाचा महान अष्टपैलू खेळाडू डेविड विसेने भारताविरुद्धच्या सामन्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नामिबिया संघ जरी कमकुवत वाटत असला तरी या सामन्यात काहीही होऊ शकते, असे त्याने म्हटले आहे.
सोमवारी (८ नोव्हेंबर) रोजी भारत आणि नामिबिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असेल. नामिबियाने आतापर्यंत एक सामना जिंकला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र, टी२० क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असा डेविड विसेचा विश्वास आहे.
एका मुलाखतीत डेविड विसे याने भारतीय संघाविरुद्धच्या सामन्याबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, “भारतीय संघाविरुद्ध खेळणे नेहमीच छान असते. भारतीय संघाला चाहत्यांचा खूप पाठिंबा असतो. भारतीय खेळाडू जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. तुम्हाला अशाच खेळाडूंविरुद्ध तर खेळायचे असते. काही खेळाडू या सामन्यात चांगली कामगिरी करू शकतात आणि त्यांना त्याचा इतरत्र फायदा होऊ शकतो. आमचा संघ कमकुवत वाटत असला तरी, सामन्यात काहीही होऊ शकते.”
डेविड विसे याने एक गोष्ट निदर्शनास आणली आहे त्याच्या बोलण्यावरून तो आयपीएलबद्दल बोलत असल्याचे दिसून येते. कारण, आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी लवकरच लिलाव होणार आहे आणि जर एखाद्या खेळाडूने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली तर त्याच्याकडे आयपीएल संघांचे लक्ष वेधले जाईल. स्वत: डेविड विसेला या सामन्यात चांगली कामगिरी करायची आहे जेणेकरून त्याला आयपीएलचा करारही मिळू शकेल. तो एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून जगभरातील व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळत असतो.






