टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. मात्र, स्पर्धेपूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) एक मोठा निर्णय घेतला असून टी20 विश्वचषक 2026 साठी भारत न येण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशला आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत. आता यावर आयसीसी (ICC) मोठा निर्णय घेऊ शकते आणि बांगलादेशची मागणी पूर्ण करू शकते.
क्रिकबझच्या अहवालानुसार, आयसीसी बांगलादेशच्या मागणीवर गांभीर्याने विचार करत आहे. बांगलादेशने (4 जानेवारी) रोजी आयसीसीला पत्र लिहून कळवले की, “सध्याच्या परिस्थितीचे सखोल मूल्यमापन करून आणि भारतात बांगलादेशी संघाच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंता लक्षात घेता, तसेच बांगलादेश सरकारच्या सल्ल्याचा विचार करून संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे की, सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशचा राष्ट्रीय संघ स्पर्धेसाठी भारतात जाणार नाही.” अशा परिस्थितीत जर बांगलादेश भारतात आला नाही, तर स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.
यापूर्वी (3 जानेवारी) रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मुस्तफिजुर रहमानला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले होते. यानंतर केकेआरने रहमानला रिलीज केले. केकेआरने त्याला 9.20 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते. भारतात काही संघटनांनी रहमानला विरोध केला होता, ज्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय घेण्यास भाग पडले.






