भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज समीर दिघे यांनी मुंबई रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयापाठीमागे काही वैयाक्तिक कारणे असल्याचे बोलले जात आहे.
समीर दिघे यांचा कार्यकाळ एक वर्षाचाच होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात दिघेंबरोबर चर्चा केली पण दिघेंनी वैयाक्तिक कारणांमुळे पुढे करार वाढवण्यास नकार दिला. चंद्रकांत पंडीत यांनी राजीनामा दिल्यानंतर दिघेंची प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती.
४९ वर्षीय समीर दिघेंनी भारताकडून २००१-०२ च्या दरम्यान सहा कसोटी,२३ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले.
दिघेंच्या प्रशिक्षणाखाली, ४१ वेळा रणजी विजेत्या मुंबईला काही खास कामगिरी करता आली नाही. आता झालेल्या रणजी मोसमात मुंबईला उपांत्यपुर्व फेरीत कर्नाटककडून पराभव पत्करावा लागला होता.
मुंबई विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली टी२० चषकात बाद फेरीपर्यंत मजल मारु शकली. मुंबईला ह्यावर्षी एकही मोठं टायटल जिंकता आलेल नाही.