न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका भारतीय संघाने ३-० अशा फरकाने जिंकली. मालिकेपूर्वी भारतीय संघाचे मागच्या काही दिवसांपासूनचे वेळापत्रक व्यस्त होते. अशात खेळाडूंना विश्रांती न मिळाल्यामुळे संघाला टी२० विश्वचषकात देखील अपेक्षिक कामगिरी करता आली नाही. विश्वचषकानंतर खेळल्या गेलेल्या या टी२० मालिकेत संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आणि युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. युवा खेळाडूंनीही अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले आणि संघाला मालिका जिंकवून दिली. आता याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने कर्णधार रोहित शर्मा आणि संघाच्या निवडकर्त्यांचे कौतुक केले आहे.
भारताला या टी२० मालिकेनंतर न्यूझीलंडसोबतच दोन सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. त्यानंतर संघाला दक्षिण अफ्रिकेसोबत सर्व प्रकारच्या क्रिकेट मालिका देखील खेळायच्या आहेत. अशात आगामी काळातील संघाचे व्यस्त वेळापत्रक पाहून न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत निवडकर्त्यांनी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली.
अकमलच्या मते संघातील वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर असताना देखील भारताने अप्रतिम प्रदर्शन केले. ही गोष्ट जगातील कोणत्याच दुसऱ्या संघात पाहायला मिळत नाही. त्याने भारतीय निवडकर्त्यांचेही त्यांनी घेतलेल्या या निर्णयासाठी कौतुक केले आहे. अकमल त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. तो म्हणाला की, “हा भारतासाठी एक अप्रतिम विजय आहे, विशेष करून काही नवीन खेळाडूंसोबत. जगातील दुसऱ्या कोणत्याच संघाला असे करता येत नाही. कारण, भारताकडे प्रतिभाशाली खेळाडूंचा संच आहे आणि ते त्यांना संधी देत राहतात. ते या मालिकेत दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी खेळाडूंना तयार करत आहेत आणि त्यांचा वर्कलोड मॅनेज करत आहेत.”
अकमलने पुढे बोलताना रोहित शर्माच्या नेतृत्वाचे देखील कौतुक केले. तो म्हणाला की, “त्याच्या फलंदाजी प्रमाणेच त्याच्या नेतृत्वातही आक्रमकता दिसते. संघातील अनेक महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन देखील संघ अप्रतिम प्रदर्शन करत आहे आणि मालिका जिंकला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना खेळून येणाऱ्या संघासोबत असे प्रदर्शन कौतुकास्पद आहे.” निवडकर्त्यांचे कौतुक करताना तो म्हणाला की, “त्यांनी खुपच हुशारीने खेळाडूंना विश्रांती देऊन वर्कलोड मॅनेज केला आहे. तसेच दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी देखील खेळाडूंना तयार करत आहेत.”