क्रिकेट हा आऊटडोर गेम आहे. हा खेळ बंदिस्त स्टेडियममध्ये खेळला जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा नैसर्गिक अडथळ्यांमुळे मॅच थांबवली जाते. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पाऊस. क्रिकेटच्या 95 टक्के मॅचेस या पावसामुळेच थांबवल्या जातात. अगदीच मैदानात एखादा प्राणी घुसला तर काही मिनिटांपुरता खेळात व्यत्यय येतो. शारजातील सँडस्टॉर्म हे देखील असेच अपवादात्मक उदाहरण. मात्र, अनेकदा यापेक्षाही काही वेगळ्या कारणांनी एखादी रंगात आलेली मॅच थांबवली जाते. ही परिस्थिती प्रामुख्याने मानवनिर्मित अथवा तंत्रज्ञानामुळे उद्भवलेली असते. आजच्या लेखामध्ये आपण त्याच कारणांची माहिती करून घेणार आहोत.
मधमाशांचा हल्ला
नजीकच्या काळात एखादी क्रिकेट मॅच ज्या कारणाने बऱ्याचदा थांबवली गेली आहे, ते म्हणजे मधमाशांचा हल्ला. बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानावर मधमाशांनी आक्रमण केल्याची उदाहरणे दिसून येतात. बेंगलोर येथील एका स्थानिक मॅचमध्ये मधमाशांनी असा काही हल्ला केला होता की, सहा खेळाडूंना दवाखान्यात दाखल करावे लागलेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2008 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दिल्ली टेस्टमध्ये बऱ्याच वेळ या मधमाशांनी खेळ रोखला होता. 2019 मध्येही दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका पिंक वनडेत अशाचप्रकारे मधमाशांनी हल्ला केला होता. त्यावेळी क्विंटन डी कॉकच्या हेल्मेटवर बसलेल्या शेकडो मधमाशांचा फोटो चांगलाच व्हायरल झालेला.
राजाचं निधन
भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1951-1952 मध्ये इंग्लंडने भारताचा दौरा केला होता. पाच मॅचच्या टेस्ट सीरिजमधील चौथी टेस्ट इंग्लंडने जिंकत आघाडी घेतलेली. पाचवी टेस्ट चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळली जात होती. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर इंग्लंडवरून बातमी आली की, इंग्लंडचे राजे सहावे किंग जॉर्ज यांचे निधन झाले आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर होणारा रेस्ट डे दुसऱ्याच दिवशी घेतला गेला. पुढे जाऊन भारताने ही मॅच जिंकली आणि इंग्लंडवर पहिल्यांदा विजय साजरा केला.
इंदिराजींची हत्या
सन 1984-1985 मध्ये टीम इंडिया शेजारी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेली. मात्र, हा दौरा पूर्णच होऊ शकला नाही. याचे कारण होते पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या (Indira Gandhi Murder). या दौऱ्यावर दोन टेस्टनंतर तीन वनडे मॅच खेळल्या जाणार होत्या. आणि वनडे सीरिजनंतर राहिलेली एक टेस्ट पूर्ण होणार होती. पहिल्या दोन टेस्ट ड्रॉ झाल्या. वनडे सीरिजमधील पहिली मॅच पाकिस्तानने जिंकली. दुसरी वनडे सियालकोट येथे खेळली जात होती. मोहिंदर अमरनाथ प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करत होते. पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाने 210 रन्स बनवल्या. मात्र, त्याचवेळी दिल्लीत इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याची बातमी आली. त्या क्षणी ती मॅच अर्धवट ठेवून, संपूर्ण दौरा रद्द केला गेला. भारतीय संघाला तातडीने मायदेशी बोलावले गेले. दुर्दैवाने त्यानंतर अमरनाथ यांना पुन्हा कधीही टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.
पदार्थाच्या भांड्यात पडलेला बॉल
क्रिकेट मॅच थांबण्याचे सर्वात हास्यास्पद कारण कोणते असेल तर ते दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या मॅचमधील. एका डोमेस्टिक मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचे इंटरनॅशनल क्रिकेटर रॉजर टेलमार्कस व डॅरेल कनिनन आपापल्या संघासाठी खेळत होते. टेलमार्कसच्या बॉलिंगवर कलिननने एक उत्तुंग सिक्स मारला. मात्र, तो बॉल फ्राईड कॅलामरी या पदार्थाच्या भांड्यात पडला. बॉल पुन्हा एकदा ग्राउंडमध्ये टाकला गेला. मात्र, तो गरम झाला असल्याने त्याला कोणीही हात लावण्यासाठी धजावत नव्हते. तब्बल 10 मिनिटांनी खेळ पुन्हा सुरू झाल्यावर टेलमार्कसने आपली ओव्हर पूर्ण केली. क्रिकेट इतिहासातील सर्वात हास्यास्पद घटनांपैकी ती घटना होती.
कार थेट ग्राऊंडमध्ये
सन 2017 मध्ये रणजी ट्रॉफीतही एका आगळ्यावेगळ्या कारणाने मॅच काही काळ थांबवली गेलेली. दिल्लीतील पालम स्टेडियम येथे दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश ही रणजी ट्रॉफी खेळली जात होती. त्यावेळी अचानक गिरीश शर्मा नावाचा व्यक्ती आपली कार घेऊन ग्राउंडमध्ये दाखल झाला. त्याने कार थेट पिचवर उभी केली. विशेष म्हणजे त्या मॅचमध्ये गौतम गंभीर, ईशांत शर्मा, रिषभ पंत, मनोज तिवारी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटरही खेळत होते. ही सुरक्षिततेतील मोठी चूक होती. कार बाहेर गेल्यानंतरही जवळपास अर्धा तास खेळ थांबवला गेला. पिचची पाहणी झाल्यावर पीच खेळण्या लायक असल्याचे समजल्यानंतर खेळ पुन्हा सुरू केला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विंबल्डन खेळलेला भारतीय क्रिकेटर, इंग्लंडमध्ये राहून टेनिसवर गाजवलं अधिराज्य
क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून