भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषकातील लढत आता निश्चित झाली आहे. पाकिस्तानने सुरुवातीला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता, मात्र आयसीसी (ICC) आणि इतर क्रिकेट बोर्डांशी झालेल्या आठवडाभराच्या चर्चेनंतर पाकिस्तानने आपली भूमिका बदलली असून सामना खेळण्यास होकार दिला आहे.
हा सामना रद्द झाला असता तर प्रक्षेपण हक्क, जाहिराती आणि तिकीट विक्रीतून मिळणारे तब्बल 174 मिलियन डॉलर्स (सुमारे 1450 कोटी रुपये) बुडाले असते. हा मोठा आर्थिक फटका आता टळला आहे.
सामना निश्चित होताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबई ते कोलंबो विमान प्रवासाचे तिकीट जे आधी 10,000 रुपये होते, ते आता थेट 60,000 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास बांगलादेशने नकार दिला होता. आयसीसीने त्यांची मागणी फेटाळल्याने आणि मतदानात पाठिंबा न मिळाल्याने बांगलादेशने विश्वचषकातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.
जर पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला असता, तर त्यांना केवळ आर्थिक नुकसानच सोसावे लागले नसते, तर भविष्यातील आयसीसी स्पर्धांच्या यजमानपदावर आणि पीएसएल (PSL) मधील विदेशी खेळाडूंच्या समावेशावरही गदा आली असती.






