रविवारी (३ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान, पंजाबचा कर्णधार केएल राहुल पंचांवर चांगलाच रागवला. केवळ मैदानावरील पंचच नाही तर तिसऱ्या पंचांनीही चुकीचा निर्णय दिल्याने राहुलला राग अनावर झाला व त्याने बराच वेळ मैदानी पंचांशी हुज्जत घातली.
अशी घडली घटना
पंजाबचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई आठव्या षटकात गोलंदाजी करत होता. बेंगलोरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने बिश्नोईच्या गुगलीवर रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि ग्लव्सला चेंडू लागून थेट यष्टीरक्षक असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. राहुलने जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी त्याला बाद दिले नाही. यानंतर पंजाबच्या कर्णधाराने डीआरएसच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाची मदत घेतली.
तिसऱ्या पंचांचा ही चुकीचा निर्णय
जेव्हा तिसऱ्या पंचांनी या घटनेचा रिप्ले पाहिला, तेव्हा चेंडू ग्लव्सला स्पर्श झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. अल्ट्रा एजद्वारे स्पाइक देखील दिसत होता, परंतु असे असूनही, तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले.
https://twitter.com/zsnfarooqui07/status/1444618073613365249?t=lRQkkJrDvm2lwVoSKSy3RQ&s=19
स्पाइक दिसूनही तिसऱ्या पंचांनी देवदत्तला बाद न दिल्याने राहुल पुन्हा एकदा मैदानावरील पंचांपर्यंत पोहोचला आणि त्यांना सांगितले की, अल्टा-एजमध्ये स्पाइक आहे. अशावेळी बाद निर्णय द्यायला पाहिजे होता. पंचांनी काहीही प्रतिक्रिया न दिल्याने तो नाराज झाला. षटक संपल्यानंतरही त्याने पुन्हा एकदा पंचांकडे याबाबत सविस्तर विचारणा केली. पंचांच्या या निर्णयामुळे समालोचन कक्षात उपस्थित असलेला गौतम गंभीरही आश्चर्यचकित झाला होता.
बेंगलोरचा प्ले ऑफमध्ये प्रवेश
या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने तो निर्णय सार्थ ठरवला. पडिक्कल आणि विराट कोहलीने संघाला ६८ धावांची सलामी दिली. विराट कोहली २५ धावांवर बाद झाला. आरसीबीने निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या. आरसीबीने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करतांना पंजाबची सुरुवात उत्तम झाली होती. सलामीवीर मयांक (५७) आणि राहुल (३९) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र यांच्यानंतर एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने अखेर पंजाबचा संघ ६ धावांनी पराभूत झाला.






