भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका मंगळवारी(19 जानेवारी) संपली. या मालिकेतील गाबा येथे चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा सामना 3 विकेट्स राखून जिंकला. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका 2-1 या फरकाने जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे खुष होता. त्याने सामन्यानंतर भारतीय संघाचे भरभरुन कौतुक केले.
भारताने ऑस्ट्रेलियात ही सलग दुसरी कसोटी मालिका जिंकली या अगोदर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018-19 ला भारताने विजय मिळवला होता. त्याचबरोबर भारतीय संघाने गाबा येथे 32 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची कामगिरीही केली. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयाचे महत्व द्विगुणित झाले. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने आपल्या संघातील सर्व सदस्याचे कौतुक केले. भारतीय संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना अजून एकदाही पराजित झाला नाही. त्याच्या नावाप्रमाणे भारतीय संघ सुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली अजिंक्य आहे.
अजिंक्य रहाणे सामन्यानंतर बोलताना म्हणाला, “हा विजय खूप महत्त्वाचा आहे. मला माहित नाही, या विजयाबद्दल भावना कशा व्यक्त करू. मला माझ्या संघातील प्रत्येक खेळाडूंवर गर्व आहे. आम्हाला फक्त आमचे सर्वश्रेष्ठ योगदान द्यायचे होते. परिणाम काय होतील यांच्याबद्दल विचार केला करत नव्हता.”
अजिंक्य पुढे म्हणाला, “जेव्हा मी फलंदाजी करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा माझ्यात आणि चेतेश्वर पुजारामध्ये याच विषयावर चर्चा केली जात होती की, पुजाराला सर्वसाधारणपणे फलंदाजी करायची आहे आणि मला माझे शॉट्स खेळायचे आहेत. कारण आम्हाला माहित होते की, पुढे मयंक आणि पंत आहेत. पुजाराला श्रेय द्यावे लागेल. त्याने ज्या प्रकारे दबावाचा सामना केला, ते खरचं शानदार आहे. शेवटी पंतने सुद्धा दमदार कामगिरी केली.”
अजिंक्य म्हणाला,” 20 विकेट्स घेणे महत्वाचे होते. यासाठी आम्ही पाच गोलंदाज निवडले. वॉशिंग्टन सुंदरने संघात संतुलन निर्माण केले. सिराजने दोन सामने खेळले होते, सैनी एक सामना खेळला होता. ठाकूरने सुद्धा एक सामना खेळला होता. नटराजनने पदार्पण केले होते. अशा संघासोबत सामना आणि मालिका जिंकणे किती महत्वपूर्ण आहे. हे शब्दात व्यक्त केले जावू शकत नाही. ”
भारतीय संघाला ही मालिका जिंकणे सोपे नव्हते. कारण भारतीय संघ एॅडलेडमध्ये 36 धावसंख्येवर सर्वबाद झाला होता. त्यांनंतर भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर भारतीय संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते. त्याचबरोबर सध्याचा संघ पूर्णपणे नवखा होता. त्यामुळे हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरतो.
अजिंक्य रहाणे म्हणाला, “ऍडलेडमध्ये झालेल्या पराभवानंतर आम्ही चर्चा नव्हती केली की, काय झाले होते. आम्हाला फक्त आमचा खेळ खेळायचा होता. चांगला विचार, मैदानावर चांगली कामगिरी करायची होती. ही भारतीय संघाच्या प्रयत्नाची गोष्ट आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या चर्चेपुढे ‘हा’ मालिकावीर दुर्लक्षितच!