टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २४ ऑक्टोबरला खेळवला जाईल. यामुळे आता सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा खेळाडूंच्या फॉर्मवर आणि फिटनेसवर लागल्या आहेत. यातच माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विन टी -२० मधील सर्वोत्तम गोलंदाज नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मांजरेकरांच्या मते, अश्विनसारखा गोलंदाज आपल्या संघात असावा असे त्यांना कधीच वाटत नाही. त्याऐवजी, त्यांना त्यांच्या संघात वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीनसारखे विकेट घेणारे गोलंदाज घ्यायला आवडतील.
दिल्ली संघांने रविचंद्रन अश्विनला केकेआरविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात शेवटच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आणले गेले. त्याला सात धावांचा बचाव करायचा होता आणि त्याने दोन विकेट घेत दिल्ली कॅपिटल्सच्या आशाही वाढवल्या. मात्र, पाचव्या चेंडूवर षटकार मारून राहुल त्रिपाठीने केकेआरला विजय मिळवून दिला.
मांजरेकर यांनी अश्विनबद्दल बोलताना म्हटले, “टी२० गोलंदाज म्हणून अश्विन भारतीय संघासाठी योग्य नाही. जर तुम्हाला अश्विनच्या गोलंदाजीत बदल घडवायचा आहे तर मला असे वाटत नाही की ते कधी घडेल. कारण, तो गेल्या पाच-सात वर्षांपासून अशीच गोलंदाजी करत आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याच्यावर अवलंबून राहणे ठीक आहे कारण तो एक महान कसोटी गोलंदाज आहे. परंतु, आयपीएल आणि टी२० क्रिकेटमध्ये तो तितका प्रभावी नाही.”
ते पुढे म्हणाले, “जर मला फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टी मिळाली तर मी माझ्या संघात अश्विनचा कधीही समावेश करणार नाही. मी वरूण चक्रवर्ती, सुनील नरीन किंवा चहल सारख्या गोलंदाजांना जास्त महत्त्व देईन. याचे कारण असे की, अश्विन हा टी२० मध्ये विकेट घेण्याचा पर्याय नाही आणि मला नाही वाटत की कोणतीही फ्रँचायझी त्याला फक्त धावा रोखण्यासाठी त्यांच्या संघामध्ये ठेवेल.”
दिल्लीचा क्वालिफायरमध्ये पराभव
कोलकाता नाईट रायडर्सने शारजाह येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १३५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात कोलकाताने २० व्या षटकात सात गडी गमावून लक्ष्य गाठले.