गेल्या आयपीएल हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम लागू करण्यात आला होता. या नियमानुसार चालू सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणं शक्य आहे. आता बीसीसीआय (BCCI) शिवाय आयसीसी (ICC) देखील नवीन नियमांवर काम करत आहे, जेणेकरून क्रिकेटचा खेळ चाहत्यांसाठी आणखी मजेदार बनेल. येत्या 2 जूनपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी मोठी माहिती समोर आली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू करण्याच्या विचारात आहे. आता हा ‘स्टॉप क्लॉक’चा नियम काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? हा नियम लागू झाल्यानंतर क्रिकेटमध्ये किती बदल होणार? हे सर्वकाही येथे जाणून घ्या.
वास्तविक, स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला नवीन षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंद दिले जातील. उदाहरणार्थ, एखाद्या संघाच्या गोलंदाजानं त्याचं षटक पूर्ण केलं तर दुसरं षटक 60 सेकंदात सुरू करावं लागेल. दरम्यान, तिसरे पंच 60 सेकंदांचा टायमर सेट करतील, जेणेकरून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कोणताही गैरसमज होऊ नये आणि योग्य वेळी ओव्हर सुरू करता येईल.
पण जर विरोधी संघ निर्धारित 60 सेकंदात दुसरं षटक सुरू करू शकला नाही तर काय होईल? असं झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला याची किंमत मोजावी लागेल. त्या बदल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून 5 धावा मिळतील. मात्र, त्याआधी पंच संबंधित संघाला दोन वेळा ताकीद देतील. मात्र तिसऱ्यांदा चूक झाल्यास विरोधी संघाला 5 अतिरिक्त धावा मिळतील. तथापि, स्टॉप क्लॉक नियम लागू झाल्यानंतर टी20 स्वरूप किती बदलते हे पाहणं मनोरंजक ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिकची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, इमोशनल पोस्ट करून मानलं चाहत्यांचं आभार