भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025चा अंतिम सामना खेळला जाणार आहे (ICC womens world cup final INDW vs SAW). हा सामना रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. भारताने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. दोन्ही संघ आता आपला पहिला विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरतील.
भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. यापूर्वी 2005 आणि 2017 मध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला होता, पण दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला होता.
आता हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर आपल्या घरच्या मैदानावर पहिला वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवण्याची मोठी संधी आहे. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताला फायनलमध्ये तीन महत्त्वाची कामं करावी लागतील.
सर्वप्रथम टॉस जिंकून फलंदाजीची निवड करणे, आणि मोठा धावसंख्या फलकावर उभी करणे म्हणजे आफ्रिकेच्या संघावर दडपण येईल. कारण फायनल सामन्यात धावांचा पाठलाग करणे कोणत्याही संघासाठी सोपं नसतं.
प्रोटियाज कर्णधार लॉरा वूल्वार्ड्ट आणि स्टार फलंदाज ताझमिन ब्रिट्स या दोघींना शक्य तितक्या लवकर बाद करणे गरजेचे आहे. त्यांच्या विकेट्स लवकर घेतल्यास आफ्रिकेचा डाव कोसळू शकतो.
दक्षिण आफ्रिकेच्या फिनिशर्स नादिन डी क्लर्क आणि मारिजान कॅप या अनुभवी खेळाडूंना लवकर परत पाठवणं भारतीय गोलंदाजांसाठी अत्यंत आवश्यक ठरेल.
ही तीन कामं जमली, तर टीम इंडिया इतिहास रचत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद आपल्या नावावर करू शकते.






