भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिका निर्णायक वनडे सामना (रविवार, १८ जानेवारी) खेळला जात आहे. इंदौर येथे सुरू असलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघ पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने हर्षित राणाच्या साथीने न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर लवकरच बाद केले. न्यूझीलंडने पहिले तीन विकेट्स गमावल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा स्फोटक फलंदाज डॅरिल मिचेल संघासाठी धावून आला.
या सामन्यात मिचेलने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आहे. त्याने १०६ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. त्याचे हे मागील ४ वनडे डावांमधील तिसरे शतक असून कारकिर्दीतील नववे शतक ठरले आहे. तसेच त्याचे हे भारताविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या ७ वनडे सामन्यांतील चौथी शतकी खेळी आहे. हे शतक करताना त्याने विल यंगसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत ५३ धावांची भागीदारीही केली.
यंगचा अडथळा हर्षितने दूर केला. सामना आता भारताच्या बाजूने आला असे वाटत असतानाच मिचेलने फिलिप्ससोबत संयमी खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. अशातच फिलिप्सनेही अर्धशतक पूर्ण केले आहे.
भारतात भारताविरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या खेळांडूच्या यादीत मिचेल ४ शतकासह (८ डाव) दुसऱ्या स्थानी आला आहे. त्याच्याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्सचा क्रमांक लागतो. त्याने ११ डावांत ५ शतके केली होती.
या सामन्याच्या सुरूवातीला भारताच्या अर्शदीपने हेन्री निकल्स आणि हर्षितने डेवॉन कॉनवे यांना एका पाठोपाठ बाद केले होते. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती १.१ षटकात २ बाद ५ धावा अशी झाली होती. यंगही ४१ चेंडूत ३० धावा करत बाद झाला. त्याला हर्षितनेच रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केले.
मिचेल-फिलिप्सचा चौकार-षटकारांचा पाऊस सुरूच असून त्यांची भागीदारी २०० पर्यंत पोहोचली आहे. तीन सामन्यांची ही वनडे मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. यामुळे मालिका विजयासाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे.






