भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेला ११ जानेवारीला सुरूवात झाली. यामध्ये दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणारा हा शेवटचा सामना मालिका निर्णायकाच्या दृष्टीने त्याचबरोबर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या चाहत्यांसाठीही महत्वाचा असणार आहे.
आपणा सर्वांना माहितच आहे की विराट आणि रोहित यांनी भारताच्या कसोटी आणि टी२० संघातून निवृत्ती घेतली आहे. यामुळे भारताकडून ते केवळ वनडे प्रकारच खेळताना दिसतात. यामुळे ते आता न्यूझीलंड मालिकेनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये थेट जून महिन्यातच दिसणार आहेत. तसे त्यांचे चाहते त्यांना आयपीएलमध्ये खेळताना पाहू शकतात.
भारताची पुढील वनडे मालिका जून महिन्यात आहे. अफगाणिस्तान विरुद्ध ही वनडे मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये विराट आणि रोहित या दोघांना संघात निवडले जाते की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण जुलैमध्ये भारताला इंग्लड दौऱ्यावर जायचे आहे. त्यामध्येही तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.
तसेच भारताला सप्टेंबर महिन्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर देखील जायचे आहे. या दौऱ्यांमध्येही तीन-तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यामुळे विराट-रोहितला अफगाणिस्तानविरुद्ध आराम दिला जाऊ शकतो. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यात तीन वनडे खेळले जाणार आहेत. डिसेंबरमध्येही श्रीलंकेविरुद्ध वनडे सामने खेळले जाणार आहेत.
या सर्व वनडे मालिकांमध्ये दोघेही सातत्याने खेळताना दिसणार की त्यांना आराम दिला जाऊ शकतो. यामुळे दोन्ही खेळाडूंचे चाहते इंदौर वनडे सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यानंतर त्या दोघांना टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पुन्हा पाहण्यासाठी 6 महिन्यांची प्रतिक्षा करावी लागेल.






