भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. भारताकडे अखेरच्या दिवशी सामन्यात विजय मिळवण्याची चांगली संधी होती. मात्र, न्यूझीलंडचे तळातील फळंदाज खेळपट्टीवर टिकून राहीले. न्यूझीलंड संघाने ९ विकेट्स गमावले होते आणि भारताला विजयासाठी फक्त एका विकेटची आवश्यकता होती. तरीदेखील भारतीय गोलंदाज हा एक विकेट मिळवू शकले नाहीत. सामना अनिर्णित करण्यासाठी न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि एजाज पटेल शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले.
ही पहिली वेळ नाही, जेव्हा भारताला एक विकेट कमी मिळाल्यामुळे सामना अनिर्णित झाला. यापूर्वी भारतीय संघावर अशी वेळ आली आहे आणि सामना अनिर्णित केला गेला आहे. ही तिसरी वेळ आहे, जेव्हा सामन्याच्या चौथ्या डावात विरोधी संघाचे ९ विकेट्स पडले, पण संघाला विजय मिळाला नाही.
यापूर्वी १९७८ मध्ये भारतीय संघावर कोलकाता कसोटीत अशीच वेळ आली होती आणि भारतीय संघाला विजयापासून अवघ्या एका विकेटमुळे मुकावे लागले होते. भारताने १९८ धावसंख्येवर वेस्ट इंडीज संघाचे ९ विकेट्स घेतले होते. पण शेवटचा विकेट भारतीय गोलंदाज घेऊ शकले नाहीत. या सामन्यात सिल्वेस्टर क्लार्क आणि स्यू शिवनारायण यांच्या जोडीने वेस्ट इंडीजचा डाव पाचव्या दिवसाच्या शेवटीपर्यंत टिकवून ठेवला.
त्यानंतर २००६ मध्ये देखील भारतीय संघाला एक विकेट कमी मिळाल्यामुळे सामना अनिर्णित झाला होता. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. वेस्ट इंडीजने २९२ धावांवर ९ विकेट्स गमावलेले. मात्र, त्यानंतर फिडेल एडवर्ड्स आणि कॉरी कॉलीमोर खेळपट्टीवर कायम राहीले आणि शेवटचा विकेट गमावला नाही. या दोघांनी १९ चेंडू खेळले आणि सामना अनिर्णित केला. फिडेलने ३६ चेंडूत फक्त १ धाव केली होती.
त्याव्यतिरिक्त सात वर्षापूर्वी श्रीलंकेविरुद्ध सामन्यात इंग्लंड संघावरदेखील अशीच वेळ आली होती. या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला ३९० धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेने २०१ धावांवर ९ विकेट्स गमावले होते. पण तरीही श्रीलंकेने हा सामना अनिर्णित केला होता.
दरम्यान, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या ५२ चेंडूत एकही विकेट मिळवला नाही. सामना अनिर्णित करण्यासाठी न्यूझीलंड संघाच्या टॉम लॅथमने ५२ धावा करण्यासाठी १४६ चेंडूंचा सामना केला. विल समरविलने ११० चेंडूंचा सामना करून ३६ धावा केल्या. तसेच कर्णधार केन विलियम्सनने २४ धावा करण्यासाठी ११२ चेंडूंचा सामना केला. रचिन रवींद्रने ९१ चेंडूत १८ धावा आणि एजाज पटेलने २३ चेंडू खेळून २ धावा करत सामना अनिर्णित राखला.