ढाका येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने या विजयासह मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. भारताच्या विजयात श्रेयस अय्यर आणि आर अश्विन हे हिरो ठरले. दोघांनीही दबावाच्या स्थितीत नाबाद 71 धावांची भागीदारी रचत भारताला यादगार विजय मिळवून दिला. यावेळी अश्विन 42, तर श्रेयस 29 धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली नव्हती. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता या मालिका विजयानंतर केएल राहुल याने कुलदीपला न खेळवण्याबद्दल मौन तोडले आहे.
काय म्हणाला केएल राहुल?
केएल राहुल (KL Rahul) सामन्यानंतर म्हणाला की, “आयपीएलसाठी जो प्रभावी खेळाडूचा नियम आणला गेला आहे, जर तो कसोटीत असता, तर मी नक्कीच दुसऱ्या डावात कुलदीप यादव याला संघात घेतले असते. कुलदीपला बाहेर ठेवणे हा एक कठीण निर्णय होता. कारण, त्याने मागील सामन्यात बांगलादेशविरुद्ध आम्हाला विजय मिळवून दिला होता. त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. मात्र, पहिल्या दिवशी खेळपट्टी पाहून आम्ही निर्णय घेतला.”
‘मला पश्चाताप नाहीये’
पुढे बोलताना राहुल म्हणाला की, “आम्हाला जाणवले की, खेळपट्टीचा वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना फायदा होईल. त्यासाठी आम्हाला सर्वोत्तम आणि संतुलित संघाला खेळवायचे होते. हा एक असा निर्णय होता, जो आम्ही घेतला. तसेच, मला या निर्णयावर पश्चाताप नाहीये. जर तुम्ही पाहिले, तर लक्षात येईल की, वेगवान गोलंदाजांनी जास्त विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाजांसाठी मदत आणि खूपच उसळी होती. आम्ही हा निर्णय वनडेत खेळण्याच्या अनुभवाच्या आधारावर घेतला.”
कुलदीपने चट्टोग्राममध्ये केली धमाल
चट्टोग्राम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत कुलदीपने 8 विकेट्स घेण्याव्यतिरिक्त 40 धावाही केल्या होत्या. या शानदार प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसे पाहिले, तर कुलदीप याने त्याच्या पदार्पणापासून आतापर्यंत 5 वर्षात फक्त 8 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला 34 विकेट्स घेण्यात यश आले आहे. तसेच, कुलदीपने भारताकडून एकूण 73 वनडे आणि 25 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने वनडेत 119 आणि टी20त 44 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
केएल राहुल फ्लॉप
दुसरीकडे, केएल राहुल कसोटी मालिकेत खूपच खराब फॉर्मात दिसला. त्याने मालिकेत सलामीला उतरताना दोन कसोटी सामन्यातील चार डावात फक्त 57 धावा केल्या. याव्यतिरिक्त त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, राहुल पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण, तो जानेवारी महिन्यात अथिया शेट्टीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. (india vs bangladesh 2nd match kl rahul statement on kuldeep yadav drop from 2nd test match read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी