टी20 विश्वचषकातील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज, 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्याची उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यांना असते. नव्वदच्या दशकापासून ते अगदी आताच्या काळापर्यंत भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये अनेक वाद झाले आहेत. परंतु गेल्या 10-12 वर्षांत काही मोठा वाद झालेला नाही. आता आजच्या सामन्यापूर्वी या दोन देशांमधील खेळाडूंमध्ये आतापर्यंत झालेले टॉप 5 वाद कोणते? ते जाणून घ्या
वीरेंद्र सेहवाग विरुद्ध शोएब अख्तर
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग अनेकदा पाकिस्तान दौऱ्याचा उल्लेख करतो, जेव्हा त्यानं शोएब अख्तरला “बाप-बाप होता है, और बेटा-बेटा” असं म्हटलं होतं. झालं असं होतं की, वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सेहवागला सारखे बाउंसर मारत होता, ज्यानंतर सेहवागनं त्याला सचिन तेंडुलकरला बाऊन्सर टाकायला सांगितलं. अख्तरनं असं करताच सचिननं त्याला षटकार लगावला. यानंतर सेहवागनं हा डायलॉग मारला. मात्र, शोएब अख्तर नेहमीच याचा इन्कार करतो. सेहवागनं असं म्हटलं असतं तर मी गप्प बसलो असतो का? असं अख्तर म्हणतो.
गौतम गंभीर विरुद्ध शाहिद आफ्रिदी
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा गौतम गंभीरचं नाव प्रत्येकाच्या ओठावर येतं. गंभीरचे पाकिस्तान खेळाडूंसोबत अनेकदा वाद झाले आहेत. 2007 मध्ये एका एकदिवसीय सामन्यात गंभीर आणि शाहिद आफ्रिदीमध्ये भांडण झालं होतं. याची सुरुवात आफ्रिदीनंच केली होती, ज्यावर गंभीरनं जशास तशी प्रतिक्रिया दिली. पंचांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झालं होतं. 2010 मध्येही गंभीर आणि कामरान अकमल यांच्यात चकमक झाली होती. तेव्हा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं हे प्रकरण मिटवलं होतं.
व्यंकटेश प्रसाद विरुद्ध आमिर सोहेल
1996 च्या विश्वचषक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि पाकिस्तानचा फलंदाज आमिर सोहेल यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. व्यंकटेशविरुद्ध काही धावा केल्यानंतर सोहेल त्याला काहीतरी बोलला. यावर व्यंकटेशनं प्रत्युत्तर देताच आमिरनं पुढचा चेंडू स्टँडमध्ये मारणार असल्याचा दावा केला. मात्र पुढच्याच चेंडूवर व्यंकटेशनं सोहेलला क्लिन बोल्ड केलं. यानंतर पॅव्हेलियनमध्ये परततानाही दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती.
इंझमाम विरुद्ध भारतीय चाहता
1997 मध्ये कॅनडात खेळल्या गेलेल्या सहारा फ्रेंडशिप कप दरम्यान पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हकनं एका भारतीय चाहत्यावर बॅटनं हल्ला केला होता. एक चाहता इंझमामला मायक्रोफोनवर ‘आलू…आलू’ म्हणत चिडवत होता. इंझमामला स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि त्यानं आपल्या संघाच्या 12व्या खेळाडूकडून बॅट मागितली आणि ब्रेकच्या वेळी त्यानं प्रेक्षकांमध्ये घुसून चाहत्याला बॅटनं मारहाण केली.
हसन अलीचं विधान
पाकिस्ताननं भारताविरुद्ध 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर 2018 च्या आशिया कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाचं मनोबल उंचावलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध 3 विकेट घेणाऱ्या हसन अलीनं दावा केला होता की तो एकटा भारताला ऑलआऊट करू शकतो. मात्र, या स्पर्धेतील भारताविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये हसन अलीला एकही विकेट घेता आली नाही. यावरून त्याचं बरंच हसं झालं होतं. पाकिस्तानी चाहत्यांनीही त्याच्यावर टीका केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आजच्या सामन्यात कुलदीप यादव खेळला तर पाकिस्तानचं काही खरं नाही! आकडेवारीवरून समजून घ्या
भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट? सर्वात मोठ्या लढतीपूर्वी जाणून घ्या हवामान अपडेटविश्वचषकातील सर्वात मोठ्या लढतीत भारत-पाकिस्तान आमनेसामने! कोणता संघ ठरेल वरचढ? संपूर्ण स्क्वॉड Analysis