कोलकाता| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवार रोजी (२१ नोव्हेंबर) ईडन गार्डन येथे टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने २० षटकांत ७ बाद १८४ धावा करत न्यूझीलंडसमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम प्रदर्शन करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले. परिणामी १७.२ षटकातच भारताने न्यूझीलंडवर ७३ धावांनी सोपा विजय मिळवत ३-० ने मालिकेत एकतर्फी विजयही मिळवला आहे.
भारताच्या १८५ धावांच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून केवळ सलामीवीर मार्टिन गप्टिलला अर्धशतक करता आले. त्याने ३६ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त टिम सेफर्ट (१७ धावा) आणि लॉकी फर्ग्युसन (१४ धावा) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या. इतर सर्व खेळाडू १० धावांच्या आतच बाद झाल्याने केवळ १११ धावांवर आणि १७.२ षटकातच न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झाला.
भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलनेही २ विकेट्सचे योगदान दिले.
तत्पूर्वी या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मासह इशान किशनने केली. या दोघांनीही चांगली सुरुवात करताना सलामीला अर्धशतकी भागीदारी रचली. पण त्यांची ६९ धावांची भागीदारी मिशेल सँटेनरने इशान किशनला २९ धावांवर बाद करत तोडली.
त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत स्वस्तात माघारी परतले. सूर्युमारला शून्य़ावर आणि रिषभ पंतला ४ धावांवर सँटेनरनेच बाद केले. त्यानंतर श्रेयस अय्यरने रोहितला चांगली साथ द्यायला सुरुवात केली होती. रोहितने अर्धशतकही पूर्ण केले. त्याने यावेळी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३० वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विश्वविक्रम केला.
पण, तो अर्धशतक करताच १२ व्या षटकात इश सोधीच्या गोलंदाजीवर त्यालाच झेल देत बाद झाला. त्याने ३१ चेंडूच ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर १६ व्या षटकात वेंकटेश अय्यरला २० धावांवर ट्रेंट बोल्टने, तर १७ व्या षटकात श्रेयस अय्यरला २५ धावांवर ऍडम मिल्नेने बाद केले. हर्षल पटेल १८ धावांवर आपल्याच चूकीने हिटविकेट झाला. मात्र अखेरच्या षटकात दीपक चाहरने आक्रमक खेळताना भारताला १८४ धावांपर्यंत पोहचवले. चाहर ८ चेंडूत २१ धावांवर नाबाद राहिला. अक्षर पटेल २ धावांवर नाबाद राहिला.
भारताने जिंकली नाणेफेक
या सामन्यापूर्वी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक झाली असून सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघात २ प्रमुख बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर केएल राहुल याला विश्रांती देऊन त्याच्याजागी इशान किशनला संघात घेण्यात आले आहे. तर अनुभवी फिरकीपटू आर अश्विन यालाही बाकावर बसवत युझवेंद्र चहलचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच न्यूझीलंड संघात एकच मोठा बदल करण्यात आला आहे. कर्णदार टिम साउथी याच्याजागी मिचेल सँटनरकडे संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. तर लॉकी फर्ग्युसनला साउथीच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे.
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bat first in the third and final T20I.
Live – https://t.co/kbSRlDEQf1 #INDvNZ @Paytm pic.twitter.com/1q9CdXBx7e
— BCCI (@BCCI) November 21, 2021
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, व्यंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), जिम्मी नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेंट बोल्ट