– प्रणाली कोद्रे
भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या देशात छोट्यातल्या छोट्या सामन्यापासून ते अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महत्त्वाच्या सामन्यांपर्यंतच्या चर्चा उत्साहाने रंगतात. याच देशातील देशांतर्गत स्पर्धाही प्रचंड महत्त्वा्च्या आणि मानाच्या मानल्या जातात. यामध्येही मुंबई क्रिकेटचे नाव बरेच मोठे आहे. नेहमीच भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील दादा संघ म्हणून ओळखल्या गेलेल्या याच मुंबई संघाच्या नव्या गुरुची म्हणजेच नव्या प्रशिक्षकाची जून महिन्यात घोषणा करण्यात आली. या मानाच्या पदावर नियुक्ती झाली ती दिग्गज अमोल मुजुमदारची.
ही बातमी ऐकताच अनेक क्रिकेट जाणकरांच्या तोंडून निघून गेले होते की ही दिवसातील एक उत्तम आणि आनंददायी बातमी आहे. असं का तर अमोल मुजुमदार हे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाजले नसले तरी अनेक देशांतील खऱ्या क्रिकेट रसिकांना त्याच्याबद्दल माहिती आहे, हेच त्याचे सर्वात मोठे यश.
काही महिन्यांपूर्वीच अमोल मुजुमदारने मुंबई संघाचे प्रशिक्षक बनण्याची तयारी असल्याचे महास्पोर्ट्स डाॅट इनच्या (mahasports.in) फेसबुक पेजवर लाईव्ह चॅट सेशनमध्ये बोलताना स्पष्ट केले होते. त्याला या लाईव्ह चॅटमध्ये ‘भविष्यात मुंबई संघाला कोचिंग करायची संधी मिळाली तर करशील का?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना सुरुवातीला मुजुमदार म्हणाला होता, “जरुर काम करायला आवडेल. पण माझ्या काही अडचणी आहेत त्या सोडवल्या तर माझे दिलोजान मुंबईसाठी हाजीर असेल.”
तसेच तो असेही म्हणाला होता, “माझ्या डोक्यात या संघासाठी काही कल्पना आहेत. मला जर मुंबई क्रिकेट संघटना स्वातंत्र्य देणार असेल तर मला हे काम करायला नक्कीच आवडेल. मी या सेशनमध्ये सांगू इच्छितो की मला काम करताना मध्ये कुणी आडकाठी घालता कामा नये. प्रशासनाने टांग अडवायची नाही, एवढीच माझी अट आहे.” आता अमोल मुजुमदारची प्रशिक्षक बनण्याची इच्छाही पूर्ण झाली आहे.
आचरेकर गुरुजींचा शिष्य
रमाकांत आचरेकर हे नाव क्रिकेट चाहत्यांना नवे नाही. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आचरेकर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे गुरु म्हणून नावाजलेले गेले आहेत. पण त्यांच्याच तालमीत अमोल देखील तयार झाला आहे, हे अनेकांना माहित नाही. शालेय क्रिकेटमधील ज्या भागीदारीसाठी सचिन-कुंबळेची जोडी प्रसिद्ध आहे, त्याच भागीदारीवेळी पॅड बांधून आपल्या फलंदाजीची प्रतिक्षा करणारा खेळाडू होता अमोल. कदाचीत प्रतिक्षा करत रहाणे, हेच त्याच्या नशीबात होते. कारण त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची प्रतिक्षा त्याने निवृत्ती घेईपर्यंत करावी लागली, हे दुर्दैव.
देशांतर्गत क्रिकेट गाजवलेला पठ्ठ्या
आपले नाणे खणखणीत कसे वाजवायचे याचे उत्तम उदाहरण अमोलने वेळोवेळी दिले आहे. साल १९९३ -९४ च्या मोसमात मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अमोलने प्रत्येकवर्षी खोऱ्याने धावा काढल्या. त्याच्याकडे २००६-७ च्या हंगामासाठी कर्णधारपदाची जबादारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारीही त्याने योग्यपद्धतीने सांभाळताना मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती. पण त्यानंतर पुढच्या २ वर्षे तो मुंबईकडून अखेरचे खेळला. २००८-०९ नंतर मुंबई संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो आसाम आणि आंध्रप्रदेशकडून क्रिकेट खेळला. तिथेही तो चांगला खेळला.
त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आकडेवारी अफलातून आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १७१ सामने खेळले होते. दरम्यान ४८.१३ च्या सरासरीने फलंदाजी करताना १११६७ धावा केल्या आहेत. यात ३० शतके आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. रणजीमध्ये तो वासीम जाफरनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने रणजीमध्ये ९२०२ धावा ठोकल्या आहेत. एवढेच नाही तर अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांतही ३ शतकांसह ३२८६ धावांची नोंद त्याच्या नावावर आहे.
नशीबानं वेळेचं गणित चुकलं
अमोल मुजुमदार ज्यावेळी क्रिकेट खेळला, त्याच काळात भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग अशी फलंदाजीची फळी खेळत होती. त्यामुळे यांच्यातील कोणाला काढणार आणि अमोल मुजुमदारला खेळवणार हा प्रश्न होता. त्यामुळे नशीबाने म्हणा किंवा दुर्दैवाने अमोलला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागली. यात ना त्यावेळी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची चूक होती, ना अमोल मुजुमदारची, कारण तेंडुलकर, द्रविड, गांगुली यांनीही सातत्याने चांगलं खेळत आपले नाणे खणखणीत वाजवले होते. त्यामुळे परिस्थितीच अशी होती की अमोलला कधी भारतीय संघात खेळण्याची संधी आलीच नाही. ज्यावेळी या खेळाडूंनी निवृत्ती घेतली, तेव्हा अमोलला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी फार उशीर झाला होता. भारताकडे अनेक युवा खेळाडूंची रांग होती. त्याचमुळे अमोलने नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळण्याचा विचार केला होता. तो तिथे ४ वर्षे क्लब क्रिकेट खेळला, मात्र तिथेही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करता आले नाही.
आयपीएलमध्येही निराशाच
वेगवान क्रिकेट खेळण्याची स्पर्धा म्हणून ओळखल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेत द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सचिन अगदी थोडी का होईना पुजारालाही संधी मिळाली. मात्र, इथेही अमोलला निराशाच मिळाली. त्याच्यात प्रतिभा असुनही त्याला कोणत्याही संघाने पसंती दाखवली नाही, त्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकला नाही.
प्रत्येकवेळी निराशा हाती येत असतानाही क्रिकेटसाठी संपूर्ण समर्पण
खेळाडू म्हणून कितीही चांगली कामगिरी केली तरी मोठी संधी मिळाली नसली तरी अमोल मुजुमदारने क्रिकेट सोडण्याचा विचार केला नाही. हो, त्याच्या मनात एकदा-दोनदा विचार आला, पण त्याची पत्नी आणि ज्येष्ठ पत्रकार मकरंद वायगणकर यांनी दिलेल्या धीरामुळे त्याने तो विचार झटकून दिला. तो प्रत्येकवेळी स्वत:चे सर्वस्व देत राहिला.
इतकेच काय पण त्याने खेळाडू म्हणून क्रिकेटचा निरोप घेतल्यानंतरही तो क्रिकेटमध्येच रमला, पण कधी समालोचक म्हणून तर कधी प्रशिक्षक म्हणून. अमोलने नेदरलँड्सचे फलंदाजी प्रशिक्षकपद सांभाळले. इतकेच काय तर २०१९ साली भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा फलंदाजी मार्गदर्शक म्हणूनही त्याने काम पाहिले. तो सध्या आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्याही कोचिंग टीममध्ये कार्यरत आहे.
ज्या क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळण्याची कधी संधी मिळाली नाही, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, ही खरंतर मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. इतके वर्ष क्रिकेट खेळल्याने क्रिकेटची उत्तम जाण आलेला अमोल मुजुमदार आता मुंबई संघाला मार्गदर्शन करत आहे. गेल्या काही वर्षात मुंबई क्रिकेटने काही चढ-उतार पचवले आहेत. आता ज्या मुंबईने क्रिकेटचे संस्कार केले, त्याच मुंबई संघाचे प्रशिक्षकपद अमोल मुजुमदार सांभाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभय शर्मांना मागे टाकत ‘हे’ बनले भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाचे प्रमुख दावेदार
इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी का बांधली दंडावर काळ्या रंगाची पट्टी? भारताशी होता संबंध
“हर्षल भारतीय संघात जागा मिळवण्याचा हकदार”; भारतीय दिग्गजाने गायले गोडवे