भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्या अद्भुत कामगिरीमुळे भारतीय फुटबॉल संघाने मोठा विजय प्राप्त केला आहे. भारताने बुधवारी(१३ ऑक्टोबर) झालेल्या सॅफ (SAFF – South Asian Football Federation) स्पर्धेच्या सामन्यात यजमान मालदीवला ३-१ असे पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने १२ व्या वेळेस या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेचा हा एक विक्रम मानला जात आहे.
भारताकडून पहिला गोल मनवीर सिंगने केला. सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला मनवीरने भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर मालदीवच्या अली अश्फाकने ४५ व्या मिनिटाला गोल करत सामन्यात मालदीवला बरोबरीत आणले. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची जादू चालली, त्याने ६२ व्या आणि ७१ व्या मिनिटाला एकापाठोपाठ एक गोल करत भारताला विजयाच्या समीप नेले.
पेलेंचा विक्रम सोडला मागे
आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्री आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेलेंना मागे टाकत तिसरे स्थान गाठले आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लिओनेल मेस्सीच्या फक्त एक गोल मागे आहे. सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत पोर्तुगालचा ख्रिस्टीयानो रोनाल्डो आहे. त्याने आत्तापर्यंत ११५ गोल केले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेला मेसीने ८० गोल केले आहेत तर भारताचा सुनील छेत्री ७९ गोलांसह तिसऱ्या स्थानी आहे.
सुनील आता सक्रिय खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक गोल करणारा जगातील तिसरा खेळाडू बनला आहे.
अंतिम सामन्यात नेपाळशी भिडणार भारत
भारतीय संघाचा अंतिम सामना आता नेपाळसोबत १६ ऑक्टोबरला होईल. नेपाळने बांगलादेशसोबत सामना बरोबरीत सोडवून अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली होती. साखळी सामन्यात भारतीय संघाने नेपाळला १-० असे हरवले होते. भारताने पाच संघांच्या यादीत आठ गुणांसह अंतिम फेरी गाठली, तर नेपाळ सात गुणांसह अंतिम फेरीत पोहचला आहे.
विक्रमी विजयाची भारताला संधी
भारतीय संघाने सॅफ (SAFF) स्पर्धेचे सात वेळेस जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने १२ वेळेस स्थान मिळवले आहे. आता आठव्या वेळेस ही स्पर्धा जिंकण्याची संधी भारतीय संघास मिळाली आहे. नेपाळला हरवून भारत हा विक्रम करू शकतो.