भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिला सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला. भारतासाठी शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांच्या तुफानी शतके, तर केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके साजरी केली.
इंदोर येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टील स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लहान सीमारेषा असलेल्या या मैदानावर भारतीय संघाला पहिला झटका लवकर बसला. ऋतुराज गायकवाड केवळ आठ धावा करून माघारी परतला. त्यानंतर मात्र शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. पुनरागमन करत असलेल्या श्रेयस याने 85 चेंडूंमध्ये आपले तिसरे आंतरराष्ट्रीय वनडे शतक पूर्ण केले. तर, गिलने आपल्या सातव्या वनडे शतकाला गवसणी घातली. शतकानंतर दोघेही लवकर बाद झाले.
त्यानंतर कर्णधार केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. राहुलने 38 चेंडूंमध्ये 52, ईशान किशनने 18 चेंडूवर 31 व सूर्यकुमार यादव याने अखेरपर्यंत नाबाद राहत 37 चेंडू 73 धावांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियासाठी कॅमेरून ग्रीन हा महागडा ठरला. त्याने आपल्या 10 षटकात तब्बल 103 धावा खर्च केल्या.
( INDvAUS India Post 399 Runs In Indore ODI Gill Shreyas Hits 100)