शनिवारी (०२ ऑक्टोबर) अबु धाबीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४७ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. राजस्थानचा १९ वर्षीय फलंदाज यशस्वी जयस्वालने या सामन्यात अवघ्या १९ चेंडूत ५० धावा करण्याचा पराक्रम केला. जयस्वालने सामना संपल्यानंतर त्याच्या बॅटवर चेन्नईचा कर्णधार आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची स्वाक्षरी घेतली आहे.
जयस्वालने या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज हेजलवुडची चांगलीच धुलाई केली. त्याने हेजलवुडच्या गोलंदाजीवेळी एका षटकात ३ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. अशाप्रकारे त्याने १९ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले असून हे आयपीएलच्या इतिहासात अनकॅप्ड खेळाडूने सर्वाधिक वेगाने केलेले दुसरे अर्धशतक ठरले आहे. या यादीत पहिला क्रमांक ईशान किशनचा लागतो. त्याने १७ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच आयपीएलमध्ये आतापर्यंतचे सर्वात जलद अर्धशतक केएल राहुलने केले होते. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना अवघ्या १४ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते.
जयस्वालने त्याच्या तुफानी फलंदाजीने राजस्थान राॅयल्सला सामना जिंकवून दिला. सामना संपल्यानंतर त्याने त्याच्या बॅटवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार धोनीची स्वाक्षरी घेतली आहे. जयस्वालने आयपीएल वेबसाइटशी चर्चा करताना सांगितले आहे की, “मी माझ्या बॅटवर धोनीची स्वाक्षरी घेऊन खूप खुश आहे. मी पहिल्यांदा खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा विचार करत होतो, पण आम्ही १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होतो. मला माहित होते की, विकेट चांगले असायला पाहिजे. मी फक्त खराब चेंडूचा फायदा घेण्याचा आणि माझ्या संघाला ठोस सुरुवात देण्याविषयी विचार करत होते. जेणेकरून आम्ही १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करू शकू.”
https://www.instagram.com/p/CUjvgqPP9Gq/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ४ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने अवघ्या १७.३ षटकांमध्ये आणि ३ विकेट्सच्या नुकसानावर १९० धावा केरून सामन्यात विजय मिळवला. राजस्थानच्या शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाने संघासाठी महत्वाची अर्धशतकी खेळी केली.
या विजयानंतर राजस्थना राॅयल्सने १२ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत ६ व्या स्थानावर पोहोचला आहे. असे असले तरी केकेआर, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघही ५ सामने जिंकले आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या संघांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्लेऑफचे सामने सुरू होण्यापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, ४ अर्धशतक ठोकणारा ‘हा’ फलंदाज जखमी
इथेच अडलीय गाडी; दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर रोहितचं पडलं तोंड, सांगितली कुठे होतेय चूक?