चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखले जाते. चेन्नईने आतापर्यंत ४ वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. या हंगामातही चेन्नईकडून चाहत्यांना अशाच कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्याची गाडी पहिल्यापासूनच रुळावरून खाली घसरत गेली. आता आयपीएल २०२२च्या ४९व्या सामन्यात बुधवारी (दि. ०४ मे) चेन्नईला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १३ धावांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर चेन्नईच्या ट्रॉफी जिंकण्याच्या आशा तर सोडाच, त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा आणि अपेक्षांनाही तडा बसला.
चेन्नईसाठी (Chennai Super Kings) हा हंगाम खराब राहिला. या हंगामात सुरुवातीला चेन्नईचे नेतृत्व रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) हातात होते. मात्र, त्याला हे शिवधनुष्य पेलता आले नाही. त्यामुळे त्याला खास कामगिरी करता आली नाही. काही दिवसांपूर्वी त्याने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा कर्णधारपद धोनीकडे सोपवले. मात्र, एमएल धोनीलाही (MS Dhoni) चेन्नईला यश मिळवून देता आले नाही. असे म्हणले जात आहे की, बेंगलोरविरुद्धच्या पराभवाला सर्वात जास्त जबाबदार धोनीच होता.
धोनीच्या ‘या’ निर्णयाने चेन्नईचा पराभव
बेंगलोरविरुद्ध धोनीचा एक निर्णय चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरला. झाले असे की, धोनीने या सामन्यात सर्वात विश्वासू खेळाडूंपैकी एक असलेल्या ड्वेन ब्रावोला संधी दिली नव्हती. या सामन्यापूर्वी ब्रावो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही संघातून बाहेर होता. त्यावेळी समोर आले होते की, ब्रावोला छोटीशी दुखापत झालीये. मात्र, त्याला संघात न घेता चेन्नईने तो सामना जिंकल्यामुळे धोनीने या सामन्यातही ब्रावोला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करणे योग्य समजले नाही. ब्रावो हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो गोलंदाजीसोबतच फलंदाजीतूनही चेन्नईच्या ताफ्यात मजबूती आणत आला आहे.
आयपीएल २०२२मध्ये केले चांगले प्रदर्शन
ब्रावोची आयपीएल २०२२मधील कामगिरी चांगली राहिली आहे. तो चेन्नईकडून या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. ब्रावोने फक्त ८ सामन्यांमध्ये १४ विकेट्स घेतल्या आहेत. तो संघात सामील नसणे ही चेन्नईच्या पराभवाचे कारण होते. कारण, खालच्या फळीत फलंदाजीला येऊन तो सामना संपवू शकण्याचा दम राखतो. बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची मधली फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली. त्यामुळे संघाला १३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धोनीलाही करता आली नाही खास कामगिरी
कर्णधार असल्यासोबतच धोनी मागील अनेक हंगामांप्रमाणे या हंगामातही फलंदाजीत फ्लॉप ठरतोय. बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात धोनी सामना संपवेल अशी अपेक्षा होती. मात्र, तो फक्त २ धावा करून तंबूत परतला. याव्यतिरिक्त माजी कर्णधार रवींद्र जडेजाही या हंगामात फॉर्मशी झगडताना दिसला. त्याला सोपे-सोपे झेलही घेता आले नाहीत. या सामन्यात तर तो फक्त ३ धावा करून बाद झाला. दुसरीकडे, तो एकही विकेट घेऊ शकला नाही.
अशा खराब कामगिरीमुळे एकूणच चेन्नईला हंगामातून बाहेर पडावे लागले आहे. आता या हंगामात तरी चेन्नईला विजेतेपदाचं स्वप्न विसरावं लागलं आहे. विशेष म्हणजे, ५ वेळा आयपीएल विजेता बनलेला मुंबई इंडियन्स संघही प्लेऑफमधून बाहेर झाला आहे. त्यांनी खेळलेल्या ९ सामन्यांपैकी फक्त १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे, ८ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! वेगाने धावा करत असलेल्या पाटीदारचा काळ बनला चौधरी; चित्त्याच्या चपळाईने झेल घेत धाडले तंबूत