इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात सोमवारपर्यंत (१६ मे) साखळी फेरीतील ६४ सामने खेळून झाले आहेत. आता साखळी फेरीतील केवळ ६ सामने बाकी आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत रंगतदार झाली आहे. सोमवारी ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला १७ धावांनी पराभूत केले. त्यामुळे दिल्लीने प्लेऑफच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे, तर पंजाबचा मार्ग फारच खडतर झाला आहे. तरी प्लेऑफसाठी काय समीकरण असू शकते, हे जाणून घेऊ.
गुजरात प्लेऑफमध्ये, तर मुंबई-चेन्नई बाहेर
आयपीएल २०२२ प्लेऑफचा (IPL 2022 Playoffs) विचार करायचा झाल्यास गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये आधीच जागा पक्की केली आहे. तसेच क्वालिफायर १ सामन्यातील त्यांची जागाही पक्की आहे. त्यामुळे आता प्लेऑफसाठी केवळ आणखी ३ जागांसाठी संघर्ष आहे. त्यातही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून प्रत्येकी ९ पराभवांनंतर यापूर्वीच बाहेर गेले आहेत. त्यामुळे उर्वरित ७ संघ प्लेऑफमधील ३ जागांसाठी संघर्ष करत आहेत.
या ७ संघांचा विचार करायचा झाल्यास कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे तीन संघांसमोर मार्ग सर्वाधिक खडतर आहे. कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांनी १३ सामने खेळले असून ७ पराभव पाहिले आहेत. तसेच प्रत्येकी ६ विजयांसह आणि १२ गुणांसह हे दोन्ही संघ अनुक्रमे ६ व्या आणि ७ व्या क्रमांकावर आहेत. तसेच हैदराबादने १२ सामन्यांतील ७ सामन्यात पराभव पाहिला असून ५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे १० गुणांसह ते ८ व्या क्रमांकावर आहेत. या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी अन्य संघांच्या निकालावर, तसेच नेटरनरेटवर अवलंबुन राहावे लागणार आहे.
हे संघांना प्लेऑफची सर्वाधिक संधी
सध्या गुणतालिकेचा विचार करायचा झाल्यास प्रत्येकी १६ गुणांसह राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. पण राजस्थानचा अखेरचा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्सला कोलकाता नाईट रायडर्सशी दोन हात करायचे आहेत.
राजस्थान संघाचा नेटरनरेट चांगला आहे. त्यामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्के आहे. त्यांचा चेन्नईविरुद्ध खूप मोठा पराभव झाला तरच, त्यांना नेटरनरेट खाली येऊ शकतो आणि लखनऊ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला त्यांच्यावर जाण्याची संधी मिळू शकते.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ७ सामने जिंकून १४ गुणांसह ५ व्या क्रमांकावर आहे. पण, त्यांना त्यांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे बेंगलोरला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अखेरचा सामना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. तसेच, दिल्लीच्या अखेरच्या सामन्याच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
लखनऊच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांचेही १६ गुण असल्याने जवळपास त्यांचीही जागा प्लेऑफमध्ये पक्की आहे. पण, तरी त्यांना कोलकाताला जवळपास ८० धावांच्या फरकाने पराभूत करत नेटरनरेटमध्ये सुधारणा करत दुसऱ्या क्रमांकावर हक्क सांगण्याची संधी असणार आहे. पण, जरी त्यांनी कमी फरकाने कोलकाताला पराभूत केले, तरी त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश पक्का होणार आहे. मात्र, कोलकाताने लखनऊला पराभूत केल्यास अनेक गोष्टी नेटरनरेटवर अवलंबून असतील.
आता या संघांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ देखील आहे, ज्यांनी प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारी ठोकली आहे. दिल्लीने १३ सामन्यांपैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह सध्या गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. त्यांना त्यांचा अखेरचा साखळी सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना जर दिल्ली जिंकली, तर त्यांचे १६ गुण होतील, तसेच रनरेटही वाढेल, त्यामुळे त्यांना प्लेऑफ गाठण्याची उत्तम संधी असेल. पण, जर बेंगलोर संघाने गुजरातला मोठ्या फरकाने पराभूत केले आणि मुंबईने दिल्लीला पराभूत केले, तर दिल्लीचे आव्हान संपुष्टात येईल. पण, जर दिल्ली आणि बेंगलोर दोन्ही संघ आपापले अखेरचे साखळी सामने पराभूत झाले, तर नेटरनरेटवर अनेक गोष्टी अवलंबून राहतील.
महत्त्वाच्या बातम्या –
‘कॅरेबियन फ्लेवर’शिवाय आयपीएलला मजा नाय
Video: सरफराजच्या स्कूप शॉटने जिंकली मनं, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारा फटका