Rohit Sharma IPL 2024: इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने शुक्रवारी (दि. 15 डिसेंबर) धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी सर्वांना हैराण करत आगामी आयपीएल 2024 हंगामासाठी हार्दिक पंड्या याला आपला कर्णधार म्हणून निवडले. आता हार्दिकला पाच वेळा आयपीएल किताब जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा याची जागा घेईल. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय अनेक चाहत्यांच्या पचनी पडला नाही. अशात चाहते आता मुंबई इंडियन्सला जोरदार ट्रोल करत आहेत.
चाहते निराश
आयपीएल 2024 (IPL 2024) हंगामासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझीने आपल्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या खांद्यावर सोपवली. म्हणजेच आयपीएल 17 हंगामात रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून नाही, तर फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. रोहितला नेतृत्वावरून हटवण्याचा निर्णय प्रत्येकासाठी हैराण करणारा आहे.
यामागील कारण असेही आहे की, रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला पाच वेळा आयपीएल किताब जिंकून दिला आहे. तसेच, तो मागील 10 वर्षांपासून संघाचे नेतृत्व करत आहे. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते निराश झाले असून सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सबद्दल आपला राग व्यक्त करत आहेत.
ट्विटरवर प्रतिक्रिया
एका संतापलेल्या चाहत्याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून लिहिले की, “रोहितच्या नेतृत्वाशिवाय कोणतीही मुंबई इंडियन्स नाही. खड्ड्यात गेली मुंबई इंडियन्स.”
https://twitter.com/PareshkDeore154/status/1735689288837410964
दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “हे पचवणे कठीण आहे… रोहितचा कर्णधारपदाचा वारसा क्रिकेटच्या इतिहासात कोरला जाईल. आम्ही उत्कट चाहते, त्याचे मुंबईसाठीचे अमूल्य योगदान कायम आमच्या हृदयात ठेवू.”
https://twitter.com/ImRoMI45/status/1735688302303522893
आणखी एकाने राग व्यक्त करत म्हटले की, “एका युगाचा अंत. एका छपरीला कर्णधार बनवण्याचा खराब निर्णय. मुंबई इंडियन्स रोहित शर्माशिवाय काहीच नाही. अनफॉलो मुंबई इंडियन्स.”
https://twitter.com/its_Suraj45/status/1735643979943936134
रोहित शर्माने पाच वेळा बनवले चॅम्पियन
रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. सन 2011मध्ये ‘हिटमॅन’ (Hitman) रोहित मुंबईशी जोडला गेला होता. तसेच, 2013मध्ये त्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी पडली होती. रोहितने कर्णधार मिळताच त्याच हंगामाचा किताब संघाला जिंकून दिला होता. त्यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 या हंगामातही मुंबईला आयपीएल किताब जिंकून दिला होता.
कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची कामगिरी
हार्दिक पंड्या याचे कर्णधार म्हणून आयपीएल कारकीर्द झक्कास राहिली आहे. गुजरात टायटन्स संघाला पहिल्याच हंगामात हार्दिकने आपल्या नेतृत्वात किताब जिंकून दिला होता. तसेच, मागील हंगामातही त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. त्यामुळेच कदाचित मुंबईने हार्दिकवर ही जबाबदारी सोपवली आहे. हार्दिकला जेव्हा ट्रेड केले गेले होते, तेव्हाही अशा चर्चा होत्या की, तो मुंबईचे नेतृत्व करेल, पण आता हे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले आहे. (ipl 2024 fans trolled mumbai indians for removing rohit sharma as captain see twitter reactions)
हेही वाचा-
असा कर्णधार होणे नाही! रोहितची आयपीएलमधील कामगिरी एकदा पाहा
Hardik Pandya । ‘मुंबईत असंच होत आलं आहे…’, रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर जयवर्धनेचे मोठे विधान






