आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडे सर्वाधिक पैसे शिल्लक होते आणि त्यांनी या पैशांचा लिलावात योग्य वापरही केला. संघाने अनेक मॅच-विनर खेळाडूंवर बोली लावली आहे. लिलाव संपल्यानंतर आता केकेआरच्या कर्णधाराबाबत चर्चा सुरू झाली असून, ‘केकेआर रहाणेला कर्णधारपदावरून हटवणार का?’ असा प्रश्न सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत.
गेल्या हंगामात अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) फलंदाज म्हणून कामगिरी सरासरी होती. तसेच, कर्णधार म्हणूनही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. अशा परिस्थितीत, फ्रँचायझी आता लिलावानंतर कर्णधार बदलण्याचा विचार करू शकते. खेळाडूंना रिटेन lआणि रिलीज करतानाही केकेआरने रहाणेच्या नेतृत्वावर स्पष्ट भाष्य केले नव्हते.
चाहत्यांना अशी अपेक्षा आहे की केकेआर 2026 च्या हंगामात नव्या कर्णधारासह मैदानात उतरेल. विशेष म्हणजे, लिलावात केकेआरने अशा कोणत्याही खेळाडूला विकत घेतलेले नाही ज्याच्याकडे थेट कर्णधारपद सोपवता येईल. अशा वेळी फ्रँचायझी रिंकू सिंगला कर्णधार बनवण्याचा विचार करू शकते. रिंकूने ‘यूपी टी-20 लीग’मध्ये अप्रतिम नेतृत्व केले होते. तसेच, हेड कोच अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांचाही रिंकूवर मोठा विश्वास आहे. त्यामुळे नव्या हंगामात रिंकू सिंगची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.






