भारताता कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होता. मात्र आता आयपीएलच्या या हंगामाला देखील कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. काही खेळाडू गेल्या २ दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अखेर हा आयपीएल हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंबद्दलचे प्रश्न उभे राहिले आहेत.
मंगळवारी (४ मे) सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज गोलंदाज अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने संदिप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू तसेच चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस साफ करणारा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे अखेर मंगळवारी आयपीएलचा हा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानंतर परदेशी खेळाडूंना त्यांच्या मायदेशी कसे पाठवणार याबद्दल विचारले असता आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला उत्तर दिले की ‘आम्हाला त्यांना घरी पाठण्याची गरज आहे आणि आम्ही त्यासाठी मार्ग शोधू.’
सध्या भारतात वाढलेल्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीमुळे काही देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे सध्या आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंपुढे मोठे प्रश्न आहेत. असे असले तरी काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना सुरक्षित परत पाठवण्याचा विश्वास दिला होता.
तसेच आयपीएलचा १४ वा हंगाम सुरु असतानाच काही पदेशी खेळाडूंनी माघार घेत आपल्या मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळणे कायम केले होते. त्यातच काहीदिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांसाठी त्यांच्या देशाचा सीमा १५ मे पर्यंत बंद केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंबद्दल तसेच अन्य परदेशी खेळाडूंबद्दल बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विस्डेनने निवडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ, विराटला डच्चू तर रोहितला…





