त्रिनिदाद येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत कसोटीत भारतीय संघाने सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी केवळ आठ बळींची आवश्यकता असून, हा सामना जिंकल्यास भारतीय संघ क्लीन स्वीप करेल. असे असतानाच चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात ईशान किशन याने वादळी फलंदाजी करताना भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. विशेष म्हणजे त्याने ही खेळी रिषभ पंत याच्या बॅटने केली.
भारतीय संघाला 183 धावांची मोठी आघाडी मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी ताबडतोब सलामी दिली. त्यावेळी चौथ्या क्रमांकावर विराट कोहली याच्या जागी ईशान किशन याला बढती देण्यात आली. त्याने अगदी टी20 स्टाईल फटकेबाजी करत अर्धशतक साजरे केले. त्याने केवळ ते 30 चेंडूंमध्ये अर्धशतकाला गवसणी घातली. त्याच्या अर्धशतकानंतर केवळ एका चेंडूनंतर भारताचा डाव घोषित करण्यात आला. त्याने चार चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा बनवल्या.
ईशानने ही खेळी रिषभ पंत याच्या बॅटने साकारली. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजमध्ये येण्यापूर्वी किशने पंतसोबत बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी वेळ घालवलेला. त्यावेळची आठवण सांगताना ईशान म्हणाला,
“एनसीएमध्ये आम्ही एकत्रित असताना त्याने मला फलंदाजीच्या काही टिप्स दिल्या होत्या. ज्याचा फायदा मला इथे झाला. तसेच त्याची बॅट देखील मी घेऊन आलो होतो.”
पंत या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अपघातातून आता बरा होत आहे. त्याने हलक्या सरावाला सुरुवात केली असली तरी, आणखी चार ते पाच महिने तो क्रिकेट मैदानावर उतरू शकत नाही.
(Ishan Kishan Hits Maiden Fifty With Rishabh Pant Bat Against West Indies)
आणखी वाचा:
एशिया कप फायनलमध्ये यंग इंडियावर अन्याय? पंचांनी केल्या दोन अक्षम्य चुका
त्रिनिदाद कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड! चौथा दिवस रोहित-किशनच्या नावे