भारतचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची झारखंड संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती आणि त्याने पहिल्याच सामन्यात कर्नाटकविरुद्ध 125 धावांची शतकी खेळी साकारली होती. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे कर्णधार असूनही ईशान राजस्थानविरुद्धच्या सामन्यात खेळत नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, ईशान संघ सोडून घरी परतला आहे आणि यामागील कारण बीसीसीआय (BCCI) असल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात झारखंड संघाचे नेतृत्व करणाऱ्या कुमार कुशाग्रने ईशान किशनच्या अनुपस्थितीवर मौन सोडले. जेव्हा कुमार कुशाग्र टॉससाठी मैदानात आला, तेव्हा त्याने सांगितले की, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने ईशान किशनला विश्रांतीसाठी घरी पाठवले आहे. कुशाग्रने एक आनंदाची बातमी देखील दिली की, ईशान 2 जानेवारीला पुन्हा संघासोबत जोडला जाईल. याचा अर्थ असा की, ईशान किशन पुद्दुचेरी आणि तामिळनाडूविरुद्धच्या झारखंडच्या पुढील दोन सामन्यांत खेळू शकणार नाही. कुमार कुशाग्र म्हणाला, “बीसीसीआयच्या टीमने ईशान किशनला विश्रांती दिली आहे, ज्यामुळे तो घरी गेला आहे. तो 2 जानेवारीला पुन्हा संघात सामील होईल.”
काही काळापूर्वी देशांर्गत क्रिकेट (Domestic Cricket) न खेळल्यामुळे बीसीसीआयने ईशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतून बाहेर केले होते. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ईशान किशन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने त्या टी20 स्पर्धेतील 10 डावांत 517धावा कुटल्या, ज्यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. ईशानच्याच नेतृत्वाखाली झारखंडचा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा विजेता (Champion) देखील बनला. त्या दमदार कामगिरीच्या जोरावर ईशान किशनला टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला असून, पहिल्याच सामन्यात त्याने 125 धावांची खेळी केली होती.






