इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात अनेक खेळाडूंनी आणि संघांनी आपली छाप पाडल्याचे दिसून आले आहे. मात्र, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स सध्या या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. त्यांना अद्याप पहिल्या ८ सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सवर सध्या जोरदार टीका होत आहे.
आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आत्तापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यातील सर्व सामने ते पराभूत झाले आहेत, त्यामुळे आयपीएल हंगामातील पहिले ८ सामने सलग हारणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्समधील काही अनुभवी खेळाडू आहेत, जे या हंगामात मोठी कामगिरी करण्यात संघर्ष करत आहेत. यात अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डचेही (Kieron Pollard) नाव आहे.
पोलार्डने गोलंदाजीत थोडीफार चमक दाखवली असली, तरी अद्याप त्याला फलंदाजीत आपला दम दाखवता आलेला नाही. पोलार्डने या आयपीएल हंगामात ८ सामन्यांत ११५ धावाच केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर सध्या माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने पोलार्डपेक्षा यंदा जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) चांगले फटके मारत असल्याचे म्हणले आहे. उनाडकट आयपीएलच्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) आपल्या यु-ट्यूब चॅनलमध्ये बोलताना म्हणाला, ‘पोलार्डच्या बॅटला चेंडू बिलकूलच लागत नाही. तो फक्त प्रती चेंडू धावा करत आहे. अनेकदा असे वाटते की, जयदेव उनाडकट त्याच्यापेक्षा जास्त चेंडूला हिट करत आहे. हे सत्य आहे.’
याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचा माजी क्रिकेटपटू राहिलेल्या आकाश चोप्राने मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशनवरही निशाणा साधला आहे. तो म्हणाला, ‘इशान किशनच्या बॅटवरही चेंडू येत नाहीये. हे पाहाण्यासारखे आहे की एका खेळाडूचा आत्मविश्वास किती खाली येऊ शकतो. इशानला पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येते, जेव्हा तुम्ही पाहाता की, तो फलंदाजी करण्यात सक्षम नाहीये. तो प्रयत्न करत आहे, पण ज्याप्रकारे तो बाद होतोय, ते पाहून यापेक्षा वाईट होऊ शकत नाही. रोहित चांगली कामगिरी करत होता. पण त्याने एक खराब शॉट खेळला. ज्यामुळे तो बाद झाला.’
आकाश चोप्राने मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभूत व्हावे लागल्यानंतर हे भाष्य केले. मुंबईचा हा सलग ८ वा पराभव होता. रविवारी (२४ एप्रिल) झालेल्या या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने कर्णधार केएल राहुलच्या नाबाद १०३ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद १६८ धावा केल्या. मुंबईकडून राईल मेरिडीथ आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तसेच तिलक वर्माने ३८ धावा केल्या. बाकी कोणाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे मुंबईला २० षटकांत १३२ धावाच करता आल्या आणि ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊकडून कृणाल पंड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईच्या पराभवाला ‘ही’ ३ कारणे जबाबदार; कर्णधारानेच केली घोडचूक
भारत-दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी नसणार बायो-बबल? या खेळाडूंना विश्रांती मिळण्याचीही शक्यता
रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी…’