मोहाली। शुक्रवारपासून (४ मार्च) भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. हा त्याचा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. या सामन्याआधी विराटसोबत कारकिर्दीची सुरुवात करणारे तसेच विराटच्या नेतृत्वात १९ वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विराट कर्णधार असलेल्या भारताच्या १९ वर्षाखालील संघाने २००८ मध्ये मलेशिया येथे झालेला विश्वचषक जिंकला होता. त्या विश्वचषकातील सर्व खेळाडूंचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. लॉकडाउनच्या काळात हा ग्रुप सुरू करण्यात आला होता. सध्या या ग्रुपवर केवळ कोहलीची चर्चा आहे. सध्या या ग्रुपवर विराट कोहलीचे मीम्स व्हायरल होत असतात. विराटच्या १०० कसोटी सामने खेळण्याने त्याचे हे सर्व सहकारी अत्यंत आनंदी आहेत.
त्या विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू राहिलेला इक्बाल अब्दुल्ला सांगतो,
“विराट एक जबरदस्त व आक्रमक कर्णधार होता. तो नेतृत्वाच्या भावनेत इतका वाहून जात की, कधीकधी तो क्षेत्ररक्षक बदलायला विसरायचा. एकदा मी स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजाने मिडविकेटच्या दिशेने चौकार मारला. त्यावर विराट नाराज झाला. मात्र, मी त्याला आठवण करून दिली की, तू क्षेत्ररक्षण बदललेच नाही.”
त्याच संघाचा भाग असलेला तन्मय अग्रवाल म्हणतो,
“अनेक जणांना विराट खूप घमेंडी वाटतो. मात्र तो तसा नाही. त्याने अत्यंत मेहनतीने हे सर्व मिळवले आहे. मला तो आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती वाटतो.” या विश्वचषकात खेळलेला वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवान म्हणाला,
“विराट खाण्याचा खूप मोठा शौकीन होता. कनिष्ठ स्तरापासून आम्ही एकत्र खेळत आलो आहोत. तो खाण्यासाठी कुठेही जात असे. मात्र, आता त्याचा डायट व जीवनशैली पूर्ण बदलली आहे. मटन आणि भात खाणारा विराट आता मला हैरान करतो.” भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. मोहम्मद कैफ नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय कर्णधार होता.
महत्वाच्या बातम्या-