बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. तो म्हणजे, ‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है.’ हा डायलॉग तंतोतंत आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाज रिंकू सिंग याला चपखल बसलो. कारण, रिंकूने या बुधवारी (दि. १८ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडलेल्या ६६व्या सामन्यात केलेल्या खास खेळीने सर्वांची मने जिंकली.
नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअम ( Dr DY Patil Sports Academy, Mumbai) येथे पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाला २ धावांनी पराभूत व्हावे लागे. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊ (Lucknow Super Giants) संघाने एकही विकेट न गमावता २१० धावा चोपल्या होत्या. या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला फक्त २०८ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला नाही. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून रिंकू सिंग (Rinku Singh) याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूत ४० धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याची फलंदाजी पाहून असे वाटत होते की, तो कोलकाताला विजय मिळवून देईल. मात्र, एविन लुईसने त्याचा शानदार झेल टिपला आणि त्याचा हंगामातील डाव तिथेच संपला. मात्र, रिंकूच्या खेळीसाठी त्याच्यावर सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होतोय.
एक युजर ट्वीट करत म्हणाला की, “निकाल काय आहे याने फरक पडत नाही. रिंकू सिंग हाच किंग आहे.”
बाद झाल्यानंतर रिंकू थोडा नाराज दिसला. जेव्हा कोलकाताला २ धावांनी पराभूत व्हावे लागले, तेव्हा त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळताना दिसले. दुसरीकडे, त्याचा संघसहकारी नितीश राणादेखील त्याचे सांत्वन करताना दिसला. खरं तर शेवटच्या चेंडूवर कोलकाताला विजयासाठी ३ धावा करायच्या होत्या. उमेश यादवने स्टॉयनिसच्या शेवटच्या चेंडूचा सामना केला, परंतु गोलंदाजाने योग्य लाईनसह यॉर्कर टाकला आणि तो चेंडू उमेशकडून सुटला आणि तो त्रिफळाचित झाला. यामुळे कोलकाताला २ धावांनी पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे २ धावांच्या पराभवासह कोलकाता हंगामातून बाहेर पडली.
बाद होण्यापूर्वी रिंकू सिंगने आणलेलं वादळ
शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती. स्टॉयनिसच्या पहिल्या चेंडूवर रिंकूने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. यानंतर तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार भिरकावला. यावेळी असे वाटत होते की, कोलकाता हा सामना जिंकतेय. मात्र, चौथ्या चेंडूवर रिंकूने २ धावा घेतल्या आणि सामना विजयाच्या आणखी जवळ घेऊन गेला. मात्र, कोलकाता संघाला ते यश मिळाले नाही.






