भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ९ जूनपासून ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुलकडे रोहितच्या अनुपस्थितीत भारताच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पहिल्याच सामन्यादरम्यान राहुलला एक मोठा विक्रम नावावर करण्याची संधी असणार आहे.
केएल राहुल पहिल्यांदाच या मालिकेतून भारताचा टी२० कर्णधार (India’s T20I Captain) म्हणून समोर येणार आहे. तो टी२० क्रिकेटमध्ये भारताचा ८ वा कर्णधार ठरणार आहे. राहुलने यापूर्वी एका कसोटीत आणि तीन वनडे सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे आता तो जेव्हा ९ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा तो भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्व करणारा ५ व्या क्रमांकाचा खेळाडू ठरले.
राहुल (KL Rahul) ९ जून रोजी ३० वर्षे ५२ दिवसाचा असेल. त्यामुळे तो भारताचे सर्वात कमी वयात तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्व (YOUNGEST CAPTAINS) करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकेल. रोहितने ३४ वर्षे ३०८ दिवस वय असताना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नेतृत्व करण्याचा कारनामा केला होता. या यादीत अव्वल क्रमांकावर एमएस धोनी आहे. त्याने २६ वर्षे २७९ दिवस वय असताना भारताचे तिन्ही क्रिकेटमधील संघांच्या नेतृत्वाची जबाबदारी हाती घेतली होती.
दरम्यान, केएल राहुलच्या नेतृत्वाबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्या नेतृत्वाखाली अद्याप भारताला एकही विजय मिळवता आलेला नाही. तसेच विशेष गोष्ट अशी की, त्याने भारताचे वनडे आणि कसोटी या क्रिकेट प्रकारातही आत्तापर्यंत केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच नेतृत्व केले आहे. त्याने २०२१-२२ हंगामादरम्यान भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान नेतृत्व केले होते.
भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात सर्वात कमी वयात नेतृत्व करणारे क्रिकेटपटू (८ जून २०२२ पर्यंत) –
२६ वर्षे २७९ दिवस – एमएस धोनी
२८ वर्षे ४२ दिवस – विरेंद्र सेहवाग
२८ वर्षे ८२ दिवस – विराट कोहली
२८ वर्षे २९२ दिवस – अजिंक्य रहाणे
३४ वर्षे ३०८ दिवस – रोहित शर्मा
असा आहे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेसाठी (T20I Series) भारत दौऱ्यावर आला असून ९ जून रोजी पहिला सामना दिल्लीत झाल्यानंतर दुसरा सामना १२ जूनला कटकला होणार आहे. त्यानंतर १४, १७ आणि १९ जून रोजी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा टी२० सामना विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शिवम मावीच्या चेंडूवर मयांक अग्रवाल झाला दुखापतग्रस्त, व्हिडिओ होतोय व्हायरल