लखनऊमध्ये २८ वर्षांनंतर एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. जेव्हा न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येईल, तेव्हा लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर एक कसोटी हा सामना खेळवला जाईल. या दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला भारताविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका दैनिकाला सांगितले की, दोन नवीन आयपीएल फ्रँचायझींच्या आगमनापूर्वी बोर्ड लखनऊमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करू इच्छितो.
अधिकारी पुढे म्हणाले, “स्टेडियममध्ये अनेक उत्कृष्ट सुविधा आहेत आणि त्याची क्षमता सुमारे ७० हजार प्रेक्षकांची आहे. कोणत्याही आयपीएल फ्रँचायझीसाठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आयपीएलचे दोन नवीन संघ सामील होण्यापूर्वी, अहमदाबाद सारखेच लखनऊला आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करणे लाभदायक ठरेल. टी -२० विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला असता तर, लखनऊमध्येही सामने खेळले गेले असते.”
आयपीएल २०२२ पासून दोन नवीन संघ स्पर्धेत येऊ शकतात. या दोन संघांपैकी एक लखनऊचा असू शकतो आणि म्हणूनच बीसीसीआयला येथे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करायचे आहेत. लखनऊमध्ये एकमेव कसोटी सामना १९९४ मध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळवला गेला होता. हा सामना ‘केडी सिंह बाबू स्टेडियम’वर झाला होता, या स्टेडियमवर आता आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जात नाहीत. नव्याने बांधलेले स्टेडियम बरेच मोठे आहे आणि त्यात सर्व सुविधा आहेत.
टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन कसोटी सामन्यांव्यतिरिक्त त्यांना या दौऱ्यात तीन टी -२० सामने देखील खेळायचे आहेत. या मालिकेची सुरुवात टी-२० सामन्यांपासून होणार आहे. न्यूझीलंडने २०१६ पासून भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना वेगळ्या प्रकारच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात खेळवला गेला, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाने विजय मिळवला आणि भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी १५ जणांच्या मुख्य संघात स्थान न मिळाल्याने शार्दुल ठाकूर नाराज; म्हणाला…
धोनीला भारतीय संघाचा मेंटर बनविल्यानंतर आली वीरूची प्रतिक्रिया, म्हणाला…
विराटच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्यावर इरफान पठाण म्हणाला, ‘जर आपण टी२० विश्वचषक जिंकला तर…’