शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस आज आठ वर्षे पूर्ण झाली. भारतात बाळासाहेबांची एक वेगळीच प्रतिमा होती. त्यांनी केलेल्या वक्तव्याला एक वेगळेच महत्त्व असायचे. बाळासाहेबांचा राजकारण हा विषय जेवढा आवडीचा तेवढंच त्यांचे क्रिकेटरील प्रेमही महत्त्वाचे. अगदी गंमत म्हणून जरी नेटवर बाळासाहेब ठाकरे आणि क्रिकेट चाळलं तरी अनेक फोटो, बातम्या किंवा लेख आपल्याला सहज पाहायला मिळतात.
बाळासाहेब ओळखले जायचे राजकीय व्यासपीठावरील फटकेबाजी करण्यासाठी. ते कोणत्याही विरोधकाला कधी खेळपट्टीवर टिच्चून मारा करुच द्यायचे नाहीत. थेट समाचार घेणे हा त्यांचा स्वभाव. अगदी विरोधकांचा चेंडू कसाही असो, ते सीमारेषेवार धाडायचेच. राजकारणी असूनही बाळासाहेबांनी क्रिकेटच्या व्यासपीठाचा वापर अतिशय खुबीने केला. आपले पाकिस्तानबद्दलचे विचार मांडण्यासाठी अनेक वेळा क्रिकेटच्या माध्यमातून ते निशाना साधायचे. तसेच अगदी भारताबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी सचिनलाही सोडले नव्हते. याच बाळासाहेबांनी पाकिस्तानी क्रिकेट संघटना व पाकिस्तानी क्रिकेट संघाला अगदी नकोसे करून सोडले होते.
सन 1991- वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खोदून बंद पाडली मालिका
मुंबईच्या वानखेडे मैदानात 1991 साली बीसीसीआयने भारत विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामन्याचे आयोजन केले होते. दोन्ही संघ एकमेकांशी या मैदानात पाच दिवस भिडणार होते. परंतु पाकिस्तानवर रोष असलेल्या बाळासाहेबांच्या समर्थकांनी सामन्याच्या आधीच मैदानात प्रवेश केला आणि सामन्यासाठी बनवलेली खेळपट्टी खोदून उद्ध्वस्त केली. या घडल्या प्रकारामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामनाच नाही तर संपूर्ण मालिकाच रद्द करावी लागली होती.
सन 1998- भारत विरुद्ध पाकिस्तान मुंबईतील कसोटी रद्द
जानेवारी 1998 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मोठ्या धाडसाने बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तानमध्ये कसोटी सामना आयोजित केला होता. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती सरकार होते. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार हा सामना रद्द करीत असल्याचे जाहीर केले.
सन 1999- दिल्लीच्या मैदानात विषारी साप सोडण्याची धमकी
मुंबईमधील कसोटी सामना रद्द झाल्याने पुढील सामना दिल्लीत खेळवायचे ठरवले. यावेळी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातील खेळपट्टी उद्ध्वस्त केली होती. बीसीसीआयने तरीही सामना आयोजित करण्याचे ठरवले होते. सामना झाल्यास मैदानात विषारी साप सोडण्याबाबत धमकी पक्षाकडून देण्यात आली. यावर काळजी म्हणून काही अनुभवी सर्पमित्र मैदानात तैनात केले. चोख पोलीस बंदोबस्तात हा सामना खेळवला गेला. ज्यात अनिल कुंबळेने एका डावात 10 बळी घेण्याचा विक्रम केला होता.
सन 2003- आग्रा स्पोर्ट्स स्टेडियमची खेळपट्टी उखडली
भारत आणि पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंमध्ये डिसेंबर 2003 ला आग्रा स्पोर्ट्स स्टेडियमवर एक सामना रंगणार होता. या बद्दल माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मैदानात जात खेळपट्टीचे नुकसान केले होते.
सन 2005- भारत विरुद्ध पाकिस्तान वनडे सामना रोखण्यासाठी आंदोलन
भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये 17 एप्रिल 2005 रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याला रोखण्यासाठी देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेने आंदोलन पुकारले होते. चोख बंदोबस्तात हाही सामना पार पडला. वनडे मालिकेतील हा शेवटचा आणि सहावा सामना होता, ज्यात भारताला 159 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. नवख्या धोनीच्या 24 धावांव्यतिरिक्त कोणालाही धावा करता आल्या नव्हत्या. या सामन्यासह पाकिस्तानने मालिका 4-2 ने जिंकली होती.
सन 2006- पाकिस्तानचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने रद्द करण्याची मागणी
जुलै 2006 ला मुंबई ट्रेन बॉम्ब स्फोट प्रकरणात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चा हात आहे, असे समजत मोहाली आणि जयपूर येथे होणारे चॅम्पियन्स ट्रॉफीचे पाकिस्तानी संघाचे सामने रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.
सन 2009- ‘आयपीएल’ मध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळवण्यास विरोध
सन 2008 पासून आयपीएलला सुरुवात झाली होती. या एकमेव हंगामात पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसले होते. यानंतर 2008 मध्ये 26/11 हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी मिळू नये म्हणून शिवसेनेने बीसीसीआयला इशारा दिला होता. देशभरातून झालेला विरोध लक्षात घेत बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंना कायमचेच या स्पर्धेबाहेर केले.
सन 2010- शाहरुख खानचा चित्रपट पाडला बंद
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू प्रतिबंधित केल्यामुळे शाहरूख खानने याबाबत विरोध दर्शविला होता. त्यावेळी शिवसेनेने शाहरुखचा चांगलाच समाचार घेतला. त्यावेळी प्रदर्शित होणाऱ्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेनेने विरोध केला होता. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले होते.
सन 2011- विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानसमोर अडचणी
विश्वचषक 2011 चा अंतिम सामना मुंबईत होणार होता. पाकिस्तानचा संघ उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध खेळणार होता. जर पाकिस्तान संघ अंतिम सामन्यात पोहोचला असता, तर त्यांना तो सामना मुंबईत खेळावा लागणार होता. यासाठी अगोदरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाळासाहेब ठाकरेंची धास्ती घेतली होती. परंतु भारतीय क्रिकेट संघाने मोहालीतच पाकिस्तानला पराभूत करत त्यांचा प्रवास तिथेच संपवला आणि मुंबईकडे रवाना झाले. पुढे श्रीलंकेला पराभूत करून भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता.
बाळासाहेबांचा दराराच असा होता की पाकिस्तान संघ मुंबईमध्ये आतापर्यंत केवळ ४ सामने खेळला असून त्यातील ३ सामने भारताविरुद्ध तर एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. भारताविरुद्ध ब्रेबॉनवर झालेल्या दोन कसोटी सामन्यांपैकी एकात भारताने विजय मिळवला तर एक कसोटी सामना अनिर्णित राहिला. तसेच वानखेडेवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता. शेवटचा सामना पाकिस्तान संघ मुंबईत १९८९ साली खेळला.
सचिन आणि बाळासाहेब-
“आम्ही जेव्हा शिवाजी पार्कवर क्रिकेटचा सराव करायचो तेव्हा जर बाळासाहेबांची तिथे सभा होणार असेल तर लोकांमध्ये एक निराळाच उत्साह असे. ते सगळं वातावरणच भारलेलं असे. भाषण ऐकण्यासाठी लोक आतूर व्हायचे. त्यांच्या भाषणाची तयारी अत्यंत उत्साहात चालत असे.” असे सचिनने ठाकरे चित्रपट प्रदर्शनावेळी सांगितले होते.
“मी जेव्हा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे देशाला गौरव वाटेल असाच खेळ कर. मी त्यांचे हे शब्द आशीर्वादाप्रमाणेच मानायचो आणि तसा खेळ करायचा प्रयत्न करायचो.” असेही बाळासाहेबांबरोबरच्या भेटीला उजाळा देताना सचिन तेव्हा म्हणाला होता.
सचिन आणि बाळासाहेब ठाकरे
“मुंबई हा भारताचा भाग आहे आणि मी आधी एक भारतीय आहे आणि नंतर एक मुंबईकर ” हे सचिनचे वाक्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना रुचले नव्हते. त्यांनी सचिनला राजकीय वक्तव्य न करता चांगले क्रिकेट खेळण्याचा व फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.
वाचा- किचनमधील धुरामुळे झाला होता राडा, चालू क्रिकेट सामन्यात अग्निशामक दल घुसले मैदानात