टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघ आपला ‘सुपर-8’ मधील पुढचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 26 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे (India vs Zimbabwe). या सामन्याबाबत भारताचे माजी दिग्गज फलंदाज अजय जडेजा (Ajay Jadeja) यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर एका युजरने झिम्बाब्वेला पाठिंबा देत लिहिले होते की, जर झिम्बाब्वे भारताला हरवेल, तर मी टक्कल करून इकडे पोस्ट टाकेन. याला उत्तर देताना अजय जडेजा यांनी लिहिले, “जर भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध आधी फलंदाजी केली, तर 230 ते 250 धावा फिक्स आहेत. माझे हे ट्विट मार्क करून ठेवा. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सिकंदर रजाच्या (Sikandar Raza) नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने ग्रुप स्टेजमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमधील 3 सामन्यांत सलग विजय मिळवून त्यांनी ‘सुपर-8’ मध्ये प्रवेश केला. आयर्लंडविरुद्धचा त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांची ‘सुपर-8’ ची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी मोठा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 187/7 धावसंख्या उभारली होती त्याचबरोबर विजयाचा पाठलाग करताना भारतीय संघ 18.5 षटकांत अवघ्या 111 धावांवर गारद झाला. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक 42 धावा (37 चेंडू) केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. आता झिम्बाब्वेविरुद्ध भारत (Zim vs IND) पुनरागमन करून अजय जडेजा यांची भविष्यवाणी खरी ठरवतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





