सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळतोय. मयंकनं येथे नुकतीच धमाकेदार कामगिरी केली. त्यानं विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात दमदार फलंदाजी करताना शतक ठोकलं. विशेष म्हणजे, मयंकनं अवघ्या 45 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर कर्नाटकनं अरुणाचल प्रदेशचा 10 गडी राखून पराभव केला.
या सामन्यात अरुणाचल प्रदेशनं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 166 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर राजेंद्र सिंगनं 30 धावांची खेळी केली. त्यानं 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. अभिनव सिंहनं 71 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 1 षटकार मारला. हार्दिक वर्मानं 38 धावा केल्या. कर्नाटकसाठी हार्दिक राजनं घातक गोलंदाजी करत 4 बळी घेतले. कौशिकनंही 4 बळी घेतले. श्रेयस गोपाल आणि कर्णधार मयंक यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
167 धावांचा पाठलाग करताना कर्नाटककडून कर्णधार मयंक अग्रवाल सलामीला आला. त्यानं अभिनव मनोहरसह जोरदार फलंदाजी केली. मयंकनं अवघ्या 45 चेंडूत 100 धावा केल्या. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मयंकच्या धमाकेदार कामगिरीमुळे अरुणाचल प्रदेशला 10 गडी राखून पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात मयंकसोबतच अभिनव मनोहरची भूमिकाही महत्त्वाची होती. त्यानं नाबाद 66 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 4 चौकार आणि 4 षटकार मारले.
मयंक अग्रवाल बद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्यानं 1488 धावा केल्या. मयंकनं कसोटीत 2 द्विशतकं आणि 4 शतकं झळकावली आहेत. त्यानं टीम इंडियासाठी शेवटची कसोटी मार्च 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली होती. याशिवाय मयंकनं भारतासाठी 5 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्यानं शेवटचा वनडे सामना 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. मयंकनं आयपीएलमध्ये 127 सामने खेळले आहेत. या स्पर्धेत त्यानं 2665 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं दिलं मिचेल स्टार्कच्या दुखापतीबाबत मोठं अपडेट, म्हणाला…
सामन्यानंतर नितीश रेड्डी कुटुंबासोबत, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
नितीश रेड्डीच्या शतकामागे सिराजची भूमिका महत्त्वाची, 99 धावांवर असताना केला चमत्कार